मुंबई : अभिनय आणि नृत्यानं लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या श्रीदेवी यांनी जगातून अकाली एक्झिट घेतली. संयुक्त अरब अमिरात इथल्या रास अल खैमात इथल्या एका लग्नसोहळ्यात कार्डिअॅक अरेस्टने त्यांचं निधन झालं. त्या 54 वर्षांच्या होत्या. त्यांच्या अकाली जाण्यानं सिनेसृष्टीसह त्यांचे लाखो चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.


राष्ट्रपतींचा शोकसंदेश

श्रीदेवी यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करुन म्हटलंय की, “सिनेअभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. अनेक चाहत्यांची मनं दुखावून त्या अकाली निघून गेल्या. त्यांचे मूंद्रम पीराई, लम्हे आणि इंग्लिश-विंग्लिश सारखे सिनेमे इतर अभिनेत्यांसाठी प्रेरणादायी ठरतील. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुखात आम्ही सर्व सहभागी आहोत.”

पंतप्रधान मोदींचा शोकसंदेश

अभिनेत्री श्रीदेवींच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केलं आहे. पंतप्रधान मोदींनी ट्वीट करुन म्हटलंय की, “प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन झाले. त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हिच इश्वरचरणी प्रार्थना”

स्मृती इराणी यांची श्रद्धांजली

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनीही श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. स्मृती इराणींनी म्हटलंय की, “श्रीदेवी म्हणजे अभिनयाचं प्रेरणास्त्रोत होत्या. त्यांची यशस्वी कारकीर्द अचानक संपुष्टात आली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत.”

रजनीकांत यांचीही श्रद्धांजली

श्रीदेवी यांच्या निधनावर सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनीही शोक व्यक्त केला आहे. रजनीकांत यांनी ट्वीट करुन म्हटलंय की, “मी अतिशय व्यथित झालो आहे. मी एक अतिशय जवळची मैत्रीण आणि इंडस्ट्रीतील एका लिजेंडला गमावलं आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु: खात मी सहभागी आहे. मी त्यांचं दु:ख समजू शकतो.”

कमल हसनची श्रद्धांजली

श्रीदेवी यांच्या निधनावर अभिनेते कमल हसन यांनीही शोक व्यक्त केला आहे. कमल हसन यांनी ट्वीट करुन म्हटलंय की, “श्रीदेवी यांची संपूर्ण कारकीर्द मी जवळून पाहिली आहेत. त्यांची शेवटची भेट आजही आठवते. ‘सदमा की लोरी डरा रही है. हम उन्हे याद करेंगे’,” असं त्यांनी शेवटी म्हटलंय.

खासदार हेमा मालिनी यांची श्रद्धांजली

हेमा मालिनी यांनी म्हटलंय की, “ही बातमी ऐकून मोठा धक्का बसला. आम्ही याचा कधीही विचारही केला नव्हता. त्यांनी आपल्या प्रतिभेने सर्वांनाच प्रभावित केलं होतं. त्या सर्वोत्तम अभिनेत्री होत्या. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे.”

धर्मेंद्र यांची श्रद्धांजली

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी म्हटलंय की, “या बातमीने अतिशय व्यथित झालो आहे. हे असं अचानक कसं झालं? याचा मी विचार करतो, तेव्हा माझ्या मनाला तीव्र वेदना होतात. मी त्यांच्यासोबत काम केलंय. त्या शूटिंगच्या सेटवर आमच्यासाठी जेवण आणायच्या. मला आता काही करायची इच्छा होत नाही. पण त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्यासाठी आपल्याला मदत करावी लागेल.”

दिग्दर्शक सुभाष घई यांची श्रद्धांजली

“श्रीदेवींच्या अकाली एक्झिटमुळे सिनेसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही त्या अतिशय सामान्य राहायच्या. त्यांना भेटताना कधी आपण एखाद्या मोठ्या अभिनेत्रीला भेटतोय, असं वाटायचं नाही. नव्या कलाकारांनी त्यांचे सिनेमे पाहून आदर्श घ्यावा, असंच मी यावेळी सांगेन.” अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मधुर भंडरकरने म्हटलंय की, “मला अजूनही त्यांच्या निधनाच्या वृत्तावर विश्वास बसत नाही. त्यांनी अनेक सिनेमातून लिजेंड्री भूमिका साकारल्या. हे अतिशय दुर्दैवी आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नाही, याचं मला अतिशय दु:ख होत आहे. मी त्यांच्या ‘चांदनी’ सिनेमाचा इतका मोठा चाहता होतो की, माझ्या एका सिनेमाचं नावही ‘चांदनी बार’ ठेवलं.”

इंग्लिश-विंग्लिश सिनेमात श्रीदेवी यांच्या पतीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता आदिल हुसैननेही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. “मला अजूनही विश्वास बसत नाही आहे. मला अजूनही असंच वाटतंय की, ही बातमी खोटी आहे. मला त्यांच्या निधनाची बातमी एका मित्राकडून समजली. मला पहिल्यांदा वाटलं की, ही अफवाह आहे. मी ही बातमी पचवू शकत नाही आहे. मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटलो, तेव्हा त्यांचा चाहता झालो. मी त्यांना सांगितलं की, तुमचा सदमा सिनेमा पाहून मी दोन दिवस जेवलो नाही. हे ऐकून त्या थोड्याशा भावूक झाल्या होत्या.”