कंगनाच्या 'मणिकर्णिका'च्या रिलीजला हायकोर्टचा हिरवा कंदील
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 24 Jan 2019 04:40 PM (IST)
कंगनाची मुख्य भूमिका असलेल्या 'मणिकर्णिका' सिनेमात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप करत विवेक तांबे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र सिनेमाचं प्रदर्शन रोखण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतच्या बहुचर्चित 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झासी' या सिनेमाच्या रिलीजचा मार्ग मोकळा झाला आहे. याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत हायकोर्टाने सिनेमाच्या निर्मात्यांना दोन आठवड्यांत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. कंगनाची मुख्य भूमिका असलेल्या 'मणिकर्णिका' सिनेमात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप करत विवेक तांबे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. विवेक तांबे यांनी आपण राणी लक्ष्मीबाई यांच्या पाचव्या पिढीचे सदस्य असल्याचा दावा करत हायकोर्टात तसे पुरावे सादर केले. या सिनेमात राणी लक्ष्मीबाई यांची जन्मतारीख, लग्नाचं वय आणि इतर काही गोष्टी चुकीच्या दाखवल्याचा दावा त्यांनी केला होता. करणीसेनेला सॉरी-बिरी बोलणार नाही, कंगना भूमिकेवर ठाम यासंदर्भात शासन दरबारी असलेले दाखले, शालेय पुस्तकांतील इतिहासातल्या तारखा असे सर्व पुरावे असतानाही निर्मात्यांनी काही ठराविक पुस्तकांत लिहिलेल्या संदर्भाचा आधार घेतला असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. सिनेमाच्या सुरुवातीला जी सूचना प्रसारित केली जाते, त्यात कथा काल्पनिक घटनांवर आधारित असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. तसेच कुणाच्याही भावना दुखवण्याचा सिनेमाचा हेतू नाही. याशिवाय सिनेमातील काही अनावश्यक भागही वगळण्यात आल्याचं सीबीएफसीने हायकोर्टात स्पष्ट केलंय. हल्ली कोणताही सिनेमा रिलीज होण्याआधी त्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल होणं, हे काही नवीन नाही. आणि त्यातही जर सिनेमा ऐतिहासिक विषयावर आधारित असेल तर त्यावर कुणाचा ना कुणाचा आक्षेप असतोच. मात्र ऐन सिनेमा रिलीज होण्याच्या काही दिवस आधीच या याचिका का दाखल होतात? असा सवाल हल्ली सर्वसामान्य सिनेरसिकांनाही पडत नाही. कारण सर्वांनाच माहीत आहे की, 'जो दिखता है, वही बिकता है' संबंधित बातम्या :