मुंबई : पंजाबमधील सरोसो (मोहरी)च्या शेतांपासून ते स्वित्झर्लंडच्या सुंदर ठिकाणी दिग्दर्शित करण्यात आलेला, आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' (Dilwale Dulhania Le Jayenge) 25 वर्षांचा झाला. बॉलिवूडचा किंग शाहरूख खान (Shahrukh Khan) आणि काजोल (Kajol) यांच्यातील केमिस्ट्रीने रंगलेल्या या चित्रपटाने आजही प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान कायम ठेवलं आहे. दिग्दर्शक आदित्य चोप्रा (Aditya Chopra) यांचा हा चित्रपट हा त्या चित्रपटांपैकी एक आहे, जो चाहते कधीही, केव्हाही आणि कितीही वेळा पाहू शकतात. 25 वर्षापूर्वी शाहरूख-काजोलच्या अदाकारीने रंगलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही बक्कळ कमाई केली होती.



'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा चित्रपट मुंबईतील मराठा मंदिर या थिएटरमध्येही जवळपास 24 वर्ष म्हणजेच, 1274 आठवड्यांपर्यंत चालला. कोरोना व्हायरस महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊमुळे मार्च महिन्यापासून थिएटर बंद करण्यात आले. त्यामुळे या चित्रपटाची मराठा मंदिरमधील पंचवीशी हुकली, अन्यथा या चित्रपटाने मराठा मंदिर थिएटरच्या मोठ्या पडद्यावरही आपली पंचवीशी पूर्ण केली असती.



एखाद्या थिएटरमध्ये सर्वाधिक काळा चालणाऱ्या चित्रपटाचा रेकॉर्ड अशोक कुमार यांचा 1943 मध्ये रिलीज करण्यात आलेला चित्रपट 'किस्मत'च्या नावे आहे. 'किस्मत' कोलकातामधील रॉक्सी शिएटरमध्ये सतत 187 आठवडे दाखवण्यात आला होता. किस्मतचा हा रेकॉर्ड 32 वर्षांपर्यंत सुरु राहिला. हा रेकॉर्ड ब्लॉकबस्टर चित्रपट शोलेने मोडीत काढला. शोले मुंबईतील मिनर्वा थिएटरमध्ये सतत 5 वर्षांहून अधिक काळ दाखवण्यात आला. 'शोले'च्या 20 वर्षांनी रिलीज करण्यात आलेल्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटात गेल्या 24 वर्षांपासून मराठा मंदिर थिएटरमध्ये दाखवला जात होता. परंतु. कोरोना महामारीने या रेकॉर्डच्या प्रवासावर रोख लावला.


भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात यशस्वी चित्रपटांमध्ये मोडणाऱ्या या चित्रपटाची जादू अद्यापही कमी झालेली नाही. चित्रपटातील राज आणि सिमरनची प्रेमकहानी आजही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. राज सिमरन यांची प्रेम कहानी असलेला हा चित्रपट 20 ऑक्टोबर 1995 रोजी रिलीज करण्यात आला होता. प्रसिद्ध चित्रपट निर्माते यश चोप्रा यांचा मुलगा आदित्य चोप्रा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात शाहरूख खान आणि काजोल सोबतच अमरीश पुरी, फरीदा जलाल आणि अनुपम खेर हेदेखील प्रमुख भूमिकेत दिसून आले होते.


महत्त्वाच्या बातम्या : 


ड्रग्ज प्रकरणानंतर दीपिका पुन्हा फिल्ड वर; गोव्यात चित्रिकरणाला सुरूवात!


कॅन्सर उपचारानंतर संजय दत्तने दाखवली नवीन खूण! म्हणाला.. लवकरच कॅन्सरवर मात करणार