'ही 1973 ची गोष्ट आहे. मी, जया आणि आमच्या काही मित्रांना लंडनमध्ये सुट्ट्यांसाठी जायचं होतं. त्यावेळी मी आणि जया डेट करत होतो. मात्र माझे वडील, अर्थात कविवर्य हरिवंशराय बच्चन म्हणाले होते, की आम्हा दोघांचं लग्न झालं, तरच आम्ही एकत्र जाऊ शकतो. त्यामुळे मी पेचात पडलो' असं बिग बींनी सांगितलं.
'जर जंजीर सिनेमा हिट झाला, तर तुम्हाला लंडनमध्ये फिरायला नेईन, असं आश्वासन मी माझ्या मित्रांना दिलं होतं. आम्ही कोण कोण जाणार, याबाबत वडिलांनी विचारणा केली, तेव्हा 'जया' हे नावही समोर आलं. तुम्हा दोघांना जायचं असेल, तर लग्न करा आणि मगच जा' असं माझ्या वडिलांनी बजावल्याचं अमिताभ बच्चन म्हणाले. आम्ही दुसऱ्याच दिवशी लग्न केलं आणि रात्री तडक लंडनचं विमान पकडलं, असंही त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिलं आहे.
अमिताभ आणि जया बच्चन यांनी शोले, सिलसिला, अभिमान यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. सेकंड इनिंगमध्ये ते करण जोहरच्या कभी खुशी कभी गम चित्रपटातही एकत्र झळकले होते.