म्हणून बिग बी चार दिवस ताडोबा अभयारण्यात मुक्कामाला
एबीपी माझा वेब टीम | 26 Jul 2016 02:25 AM (IST)
नागपूर : राज्य शासनाचे व्याघ्रदूत बिग बी अमिताभ बच्चन लवकरच ताडोबाला भेट देणार आहेत. राज्याच्या व्याघ्रसंवर्धन प्रकल्पाअंतर्गत निर्मिती करण्यात येणाऱ्या चित्रपटामध्ये ते काम करणार आहेत. 'मला उत्तम अभिनय करण्यासाठी त्या व्यक्तिरेखेच्या भावविश्वात शिरुन त्याला काय वाटतं याची जाणीव करुन घ्यावी लागते' असं म्हणत अमिताभ बच्चन यांनी चार दिवस ताडोबा अभयारण्यात राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिथे राहून वन कर्मचाऱ्यांशी संवाद केल्यावरच मग शासनाच्या वाघ बचाओ फिल्मसाठी शूट करणार, अशा माहिती बिग बींनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी ते एक रुपयाही मानधन घेणार नाहीत. व्याघ्र आणि वन संरक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वनरक्षकासारख्या शेवटच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करावा. त्यांना आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे व्याघ्र संरक्षण, वृक्ष लागवड, जल संवर्धन, नदी शुद्धीकरण, स्वच्छ भारत या मोहिमा स्वतंत्रपणे न राबवता समन्वयानं केल्यास एकमेकांना पूरक ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.