मुंबई : आपलं सामाजिक भान जपणारा अभिनेता म्हणून ओळख असलेला अक्षय कुमार आता पोलिसांच्या मदतीसाठी धावून आला आहे. मुंबईतील नायगाव येथे त्याने पोलीस आणि त्यांच्या कुटुंबासाठी अत्याधुनिक सुविधा असलेलं रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.


मुंबई पोलिसांच्या 'उमंग 2017' या कार्यक्रमाला अक्षय कुमारने उपस्थिती लावली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दरम्यान त्याने एका मुलाखतीत आपल्याला रुग्णालय सुरु करण्याची कल्पना का सुचली, त्याचाही खुलासा केला.

वडिल हरी ओम भाटिया यांना एकदा कॅन्सरच्या उपचारासाठी घेऊन गेलो असता रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक इकडे तिकडे पडलेले दिसले. ते पाहून हृदय पिळवटून गेलं आणि स्वतःचं रुग्णालय सुरु करण्यामागचं हे एकमेव कारण असल्याचं अक्षय कुमारने सांगितलं.

वडिलांनी अनेक दिवस कॅन्सरशी लढा दिला. त्यांना उपचारासाठी टाटा मेमोरियल हॉस्पीटलमध्ये घेऊन जावं लागत असे. तिथे रुग्णाला घेऊन देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. पण राहण्याची सोय नसल्याने ते जिथे जागा मिळेल तिथे राहतात, त्यांची अवस्था खूप वाईट असते, असं अक्षयने सांगितलं.

नायगाव येथे आपण रुग्णालय यामुळेच सुरु करत आहोत की, पोलिस आणि त्यांच्या कुटुंबांना उपचाराच्या काळात राहण्यासाठी चांगली सुविधा मिळेल. पोलिस देशासाठी मोठं योगदान देतात. आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा हाच खरा मार्ग असल्याचं अक्षय कुमारने सांगितलं.