कोल्हापूर: अक्षय कुमार हा केवळ सिनेमातील हिरो नाही तर रिअल हिरो आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं. ते कोल्हापुरात बोलत होते. 


वाघा बॉर्डरनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच ध्वजस्तंभ कोल्हापुरात उभारण्यात आला आहे.  303 फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर मानाने डोलणाऱ्या तिरंगा ध्वजाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार यांच्या हस्ते झालं.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, "अक्षय कुमार हा फक्त सिनेमातला हिरो नाही, तर समाजातील रिअल हिरो आहे. तो खूपच संवेदनशील मनाचा अभिनेता आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीची जाणीव होताच त्यांनी थेट माझ्या घरी येऊन पन्नास लाख रुपयांच्या मदतनिधीचा धनादेश दिला. त्याअगोदर त्यांनी मला फोन करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. आपण परवागनी दिल्यानंतर घरी येताच त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी 50 लाख रुपयांची मदत देणार असल्याचे सांगितले. त्यावेळी एखाद्या समारंभात देण्याबाबत आपण सुचविले, पण अक्षय कुमार यांनी कोणत्याही प्रसिद्धिशीवाय निधी देत असल्याचे सांगून धनादेश सुपूर्तही केला".

अक्षय कुमारच्या भारत के वीर अ‍ॅपचं कौतुक

यावेळी मुख्यमंत्र्यांनी अक्षय कुमारच्या भारत के वीर अ‍ॅपचं कौतुक केलं.

अक्षय कुमार यांनी भारत के वीर अ‍ॅपद्वारे जवानांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम केलं आहे. या अपद्वारे सैनिकांसाठी मदतीनिधी संकलीत करीत आहे. स्वतः मोठी रक्कम त्यात टाकून त्यांनी हे कार्य सुरु ठेवले आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अक्षय कुमारच्या कामाचं कौतुक केलं.

सर्वात मोठ्या ध्वजस्तंभावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

दरम्यान कोल्हापुरातील या सर्वात उंच राष्ट्रध्वजवार हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. कोल्हापूर शहराच्या सर्व बाजूंनी हा राष्ट्रध्वज सहज दिसू शकेल, इतका उंच असून, उद्यानात 1857 ते 1947 या काळातील भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची मांडणी, महालढ्याचं महाकाव्य या रुपात जयगान अंतर्गत साकारण्यात आलेल्या भव्य प्रदर्शनाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अक्षय कुमार यांनी केली.

तसंच बलिदान, शांतता आणि समृद्धी याचं प्रतिक असणाऱ्या केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगातून भित्तीचित्राची पाहणी देखील त्यांनी केली.

मुख्यमंत्री आणि अक्षय कुमारचा सेल्फी

'आय लव्ह कोल्हापूर' या अक्षरांमधून कोल्हापूरची सर्व वैशिष्टे दर्शवणाऱ्या सेल्फी पॉईंटवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अक्षय कुमार यांनी सेल्फी देखील काढला. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व खासदार- आमदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
STD बूथप्रमाणे टॉयलेट उभारा, अक्षय कुमारचा सल्ला