चेन्नई : साऊथचा सुपरस्टार धनुष (Dhanush) आणि रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या (Aishwaryaa Rajinikanth) या दोघांनी आपला 18 वर्षाचा संसार मोडून एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. पण या दोघांची लव्हस्टोरीही भन्नाट आहे. या दोघांनी 2004 साली लग्न केलं होतं, तेही अगदी घाईगडबडीत. 


धनुषला आपल्या आयुष्यात एक यशस्वी शेफ व्हायचं होतं. पण वडिलांचे ऐकून त्याने चित्रपटसृष्टीत पाय ठेवलं. त्याच्या वडिलांनी दिग्दर्शित केलेला  'ल्लुवढो लिमाई' हा त्याचा पहिला चित्रपट. महत्त्वाचं म्हणजे हा चित्रपट सुपरहिट झाला. धनुषची या चित्रपटातील अॅक्टिंग रजनीकांतच्या मुलीला म्हणजे ऐश्वर्याला भलतीच आवडली होती. 


पहिली भेट कशी झाली?
धनुष आणि ऐश्वर्याची पहिली भेट ही एका कार्यक्रमामध्ये  झाली होती. रजनीकांतने त्याच्या मुलीची भेट ही धनुषसोबत करुन दिली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ऐश्वर्याने धनुषच्या घरी एक गुलाबाचा बुके पाठवला. त्यावर लिहिलं होतं की, 'गुड वर्क, स्टे इन टच'. धनुषला ऐश्वर्याचा हा अंदाज खूपच भावला होता. 


त्यानंतर या दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि मैत्रीही चांगली झाली. धनुष एक यशस्वी कलाकार म्हणून वाटचाल करत होता. त्यामुळे मीडियाचीही नजर त्याच्यावर होती. धनुष आणि ऐश्वर्याला एकत्र अनेकदा स्पॉट करण्यात आलं होतं. त्यामुळे या दोघांचे अफेअर असल्याची चर्चा सगळीकडे सुरु झाली. 


असं झालं लग्न
अफेअरच्या अफवेमुळे धनुष आणि ऐश्वर्या दोघेही हैराण झाले होते. त्यावेळी धनुष 21 वर्षांचा तर ऐश्वर्या 23 वर्षांची होती. मग या दोघांनीही लग्न करावं असं दोघांच्या घरच्यांनी मागणी केली. त्यानंतर अगदी घाईगडबडीत, 18 नोव्हेंबर 2004 रोजी या दोघांचे लग्न पार पडलं. हे लग्न रजनीकांत यांच्या घरी झालं. 


या दोघांना दोन मुलं असून राजा आणि लिंगाराजा असं त्यांची नावं आहेत. आता या दोघांनी 18 वर्षांच्या सुखी संसारानंतर एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. 


संबंधित बातमी :