मुंबई : #MeToo चळवळी अंतर्गत विविध क्षेत्रातील महिला आपल्यावर झालेल्या अत्याचारांविरोधात आवाज उठवत असताना एक चुकीची घटनाही व्हायरल झाली आहे. माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री सयाली भगतने महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर काही वर्षांपूर्वी केलेल्या कथित आरोपांची चर्चा पुन्हा रंगली आहे. मात्र, मी बिग बींवर गैरवर्तनाचे आरोप केलेले नाहीत, आमची बदनामी थांबा, अशी विनंती सयालीने केली आहे.


2011 मध्ये झालेल्या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, अशी पोस्ट सयालीच्या नावे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर मी लैंगिक अत्याचारांना नाही, तर सायबर क्राईमला बळी पडले, असं सयालीने स्पष्ट केलं आहे. बिग बींशिवाय शायनी अहुजा, साजिद खान आणि आर्य बब्बर या बॉलिवूड सेलिब्रेटींवर गैरवर्तनाचे आरोप करणारे सयालीचे खोटे मेसेज व्हायरल झाले होते.

'खोटी प्रेस नोट काढून माझ्या नावे फिरवण्यात आली होती. कृपया माझ्या नावे कुठलीही बातमी चालवू नका. 2011 मध्येच मुंबई उच्च न्यायालयाने सायबर क्राईमच्या केसमध्ये माझ्या बाजूने निकाल दिला होता' असं सयालीने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.



काय होतं प्रकरण?

माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री सयाली भगत जेल, द ट्रेन यासारख्या चित्रपटांमध्ये झळकली आहे. टिनू वर्मांच्या 'द वीकेंड' या सिनेमाच्या लाँचिंगला अमिताभ बच्चन प्रमुख पाहुणे होते. बच्चन यांच्या पाया पडण्यासाठी वाकलं असताना त्यांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, असा सयालीच्या नावे दावा करणारा खोटा मेसेज व्हायरल झाला होता. मात्र या मेसेजमध्ये तथ्य नसल्याचं कोर्टानेही मान्य केलं.

अमिताभ बच्चन यांनी पोलिसांची मदत घेतल्यानंतर हे सायबर क्राईमचं प्रकरण असल्याचं समोर आलं होतं. तिने बिग बींची माफीही मागितली. आपल्या संमतीविना पूर्वीच्या पब्लिसिटी टीमने खोटा मेसेज व्हायरल केला, असं सयालीने सांगितलं. सयालीने आपल्याला खजिल वाटत असल्याची भावनाही व्यक्त केली.