पुणे : सुसाट झालेला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे थ्रिलिंगही आहे. पण दोन महानगरांना जोडणाऱ्या याच रस्त्याचे अभिनेता सुबोध भावेनं वाभाडे काढले आहेत. मुंबई-पुणे प्रवासादरम्यान आलेला 'सुखद' अनुभव त्याने उपहासातून मांडला आहे.


'मी आजच प्रवास केला. मला आलेला अनुभव विलक्षण होता. काही मोटरसायकल आमच्याशी स्पर्धा करत होत्या. याच रस्त्यावर आतापर्यंत अनेक जणांनी अपघातात जीव गमावले. आपण टोल भरतो आणि स्वतःच्या जीवाशी खेळतो. यात सुधारण्याचे काही चान्सच नाहीत. जय हिंद जय महाराष्ट्र!' असं सुबोधने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

सुबोधच्या याच दाव्याची पडताळणी करण्यासाठी 'माझा'ची टीम एक्स्प्रेस वेवर पोहोचली. सुबोधने केलेला हा दावा खरा ठरला. कमाल म्हणजे सुबोधनं आणखी एक दावा केला, मला एकदम नॅशनल पार्कमध्ये असल्यासारखं वाटलं, कारण मध्येच रस्त्यात प्राणी आले होते.

सुबोधच्या या दाव्याचीही आम्ही पडताळणी केली, तेव्हा तोही खरा ठरला. जनावरं येत असल्याचं आम्ही पाहिलं आहे, हा एक्स्प्रेस वे नाहीच, कारण याला बॅरिकेटिंग नाही, असं काही नियमित प्रवाशांनी सांगितलं.

वेळ वाचवण्यासाठी आपण रस्ता बांधला. वेग वाढला, पण नियमांच्या उल्लंघनाचाही वेगही वाढला. विकासाचा वेग हा दळणवळणाच्या वेगावर अवलंबून असतो. पण फक्त अव्यवस्थेमुळे जर हाच वेग जीवावर उठणार असेल, तर अशा वेगाचा उपयोग काय?

त्यामुळे सुबोधनं व्यक्त केलेली भावना ही केवळ त्याच्या एकट्याची नाही, तर समस्त प्रवाशांची आहे. ज्याची दखल तातडीने घेण्याची गरज आहे.

पाहा सुबोधची फेसबुक पोस्ट :