Abhijeet Kelkar on Pushkar Jog : अभिनेता पुष्कर जोगने (Pushkar Jog) महापालिका कर्मचाऱ्यांबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आता अभिजीत केळकरने  (Abhijeet Kelkar) यावर आपलं मत मांडलं आहे. अभिजीतने पुष्करला पत्र लिहित आपला संताप व्यक्त केला आहे. 


अभिजीत केळकरने पुष्करला लिहिलेलं पत्र काय? (Abhijeet Kelkar Letter for Pushkar Jog)


अभिजीत केळकरने पत्र लिहिलं आहे,"प्रिय मित्र पुष्कर जोग यांस, मित्रा,तुझी चर्चेत असलेली, वादग्रस्त पोस्ट वाचली,ती सोशल मीडियावर होती त्यामुळे इथेच तुला पत्र लिहिण्याचा हा प्रपंच. मी महानगरपालिका कर्मचाऱ्याचा मुलगा आहे, ज्याचा मला सार्थ अभिमान आहे,माझी आई महानगरपालिकेत शिक्षिका होती...तिच्याबरोबर,तिला, तीच्या मैत्रिणींना मदत म्हणून मी अनेकदा जनगणना, सर्वेक्षण, प्रौढ शिक्षण ह्या कामात,अनेक वर्ष तिच्याबरोबर गेलो आहे,मदत केली आहे...उन्हातान्हात, पावसात सुध्दा फिरून, ही कामं करावी लागतात,वरून आदेश आला की त्याची अंमलबावणी करणं एवढंच त्यांचं काम असतं,दिलेल्या फॉर्मवर असलेले प्रश्न विचारावे लागतात,ते काही त्यांच्या मनातले नसतात... तुझ्या पोस्टच्या अनुषंगाने तुला काही प्रश्न विचारावेसे वाटतात". 


अभिजीतने पुष्करला खास प्रश्न विचारले आहेत. - 1. घरी आलेल्या अश्या कर्मचऱ्यांच्या लाथ घालावी असं तुला का वाटलं असेल?ते सरकारी कर्मचारी आहेत,ते आपलं काम करत आहेत असा विचार तुला करावासा का वाटलं नसेल?


2. आपली जात सांगायची लाज का वाटावी किंवा कोणी ती विचारल्यावर राग का यावा?अगदी आपण कुठल्याही जातीचे असलो तरीही लाज का वाटावी?जात म्हणजे काही आपण केलेलं वाईट काम किंवा चोरी नाही ज्याची आपल्याला लाज वाटावी, किंवा त्यात अभिमान बाळगावा असंही काही नाही कारण त्यात आपलं स्वतःचं असं काहीच कर्तृत्व नाही, ती आपणहून आपल्याला येऊन चिकटते,कितीही हवी किंवा नको म्हटली तरीही,बरोबर ना?



3. सर्वेक्षण हा सरकारचा निर्णय आहे. सरकारने काढलेला आदेश आहे. त्यामुळे तुला इतकाच राग आला आहे तर थेट त्यांच्याच लाथ घालावी असं का वाटलं नसेल?(मुळात लाथ घालावी हा शब्दप्रयोगच वाईट/चुकीचा आहे) गेला बाजार,त्याच लोकांना हे प्रश्न तू का विचारले नसशील?हल्ली पंतप्रधानांपासून ते नगरसेवकापर्यंत प्रत्येकजण सोशल मीडियावर आहे हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या तुला माहीत असेलच,मग तो राग तिथे त्यांच्यावर का काढला नसशील?


4. समजून चालू घरी आलेला महानगरपालिकेचा कर्मचारी पुरुष असता आणि तू म्हणालास त्याप्रमाणे तू खरंच लाथ घातली असतीस?तर ती घातल्यावर तो काय गप्प बसला असता असं तुला वाटतं?


अभिजीतने आपल्या पत्रात पुढे लिहिलं आहे,"आपण कलाकार आहोत,लोक आपल्याला रोज बघतात, आपल्यावर, आपल्या कलाकृतीवर अतोनात प्रेम करतात,आपलं बोलणं , वागणं फॉलो करतात,त्यामुळे जबाबदारीने वागणं, बोलणं हे आपलं कर्तव्य आहे. मी महानगरपालिका शिक्षिकेचा मुलगा असल्यामुळे तू जे बोललास ते मला फारच लागलं, त्यांचं अतिशय वाईट वाटलं,रागही आला...तू सुज्ञ आहेस असं मला वाटतं त्यामुळे आता तू काय करायला हवं हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही...ते केलंस तर लोभ आहेच तो तसाच राहील.तुझा मित्र/शुभचिंतक". 


अभिजीत केळकरच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव


अभिजीत केळकरची पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी त्याच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 100% सहमत, अगदी बरोबर, आजकाल लोक आम्ही खूप पुढारलोय असं दाखवतात, अशा कमेंट्स केल्या आहेत. 


संबंधित बातम्या


Pushkar Jog : "तर 2 लाथा मारल्या असत्या" म्हणणाऱ्या पुष्कर जोगने व्यक्त केली दिलगिरी; माफी मागत म्हणाला,"BMC कर्मचाऱ्यांबद्दल"