Akshay Indikar on Linkedin Viral Post : 'आपुल्या घरात हाल सोसते मराठी...'सुरेश भटांची ही रचना आठवण्याचं कारण म्हणजे संताप आणणारी एक जॉबसंदर्भातली पोस्ट. एका सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये मराठी उमेदवारांनी अर्ज करु नये, असं चीड आणणारं वाक्य लिहिलं होतं. आणखी धक्कादायक बाब म्हणजे ज्या दक्षिण मुंबईतील गिरगांव भागाची ओळख चाळसंस्कृती, सणसंस्कृती जपणाऱ्या मराठी माणसासाठी आहे. त्याच मराठीबहुल वस्ती असलेल्या गिरगाव (Girgaon) भागातील एका नोकरीसंदर्भातली ही जाहिरात होती. ज्यामध्ये मराठी माणसाने अर्ज करु नये. असं डोक्यात तिडीक जाणारं वाक्य नमूद केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळासह मराठी सिनेसृष्टीहीने यावर तीव्र संताप व्यक्त केला. नुकतच दिग्दर्शक अक्षय इंडिकर (Akshay Indikar) याने देखल ही पोस्ट त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली. पाहता पाहता सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली आणि संबंधित कंपनीला आपण केलेल्या घोडचुकीचा साक्षात्कार झाला. त्यांनी ही पोस्ट डिलीट केली आणि माफी मागण्यासाठी दुसरी पोस्टही लिहिलीय.


अक्षयने त्याच्या फेसबुकवरुन ही पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये त्याने कमेंट सेक्शनमध्ये मनसे या पक्षाला देखील टॅग केल्याचं पाहायला मिळालं आहे. यावर अनेकांनी मनसे नेते राज ठाकरे यांना देखील निशाण्यावर धरलं आहे. त्यातच अक्षयने देखील त्याच्या सोशल मीडियावर मनसे पक्षालाच टॅग केलंय. मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि मनसे पक्षाची भूमिका सगळ्यांना ज्ञात आहे. तसेच या प्रकणावर मनसे नेत्यांकडूनही विरोध दर्शवण्यात आला. 


अक्षयची पोस्ट नेमकी काय?


अक्षयने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर ही पोस्ट केली आहे. तसेच त्याने त्या नोकरीच्या अर्जाचा फोटो देखील त्यासोबत शेअर केलाय. अक्षयने या पोस्टमध्ये म्हटलं की, 'मुंबईत मराठी माणूस चालणार नाही हे जाहीर लिहणारी माणसं ? मराठी माणसांना मत मागणाऱ्या सगळ्या पक्षाकडून जबरी दखल घेण्याची अपेक्षा ... तरीही नागरिक म्हणून आपण खपवून घेतोय ? एवढा तिरस्कार ? शेयर करा आणि योग्य ती दखल घ्यायला भाग पाडा.'



कंपनीकडून पोस्ट डिलीट


लिंक्डिनवरील ही जाहिरात सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाली. एचआर जान्हवी सराना या नावाने लिंक्डिनवर एक जाहिरात करण्यात आली होती.त्यामध्ये मुंबईत ग्राफिक्स डिझाईनसाठी जागा असल्याची माहिती देण्यात आली होती. महत्त्वाचं म्हणजे मराठीबहुल वस्ती असलेल्या गिरगावातील एका कार्यालयात ही नोकरी होती. तरीही या नोकरीच्या जाहिरातीत मराठी लोकांनी येथे अर्ज करू नये असं सांगण्यात आलं. त्यामुळे सोशल मीडियावर याबाबत बराच आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर याची दखल घेत कंपनीकडून ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्या एचआरकडून माफी देखील मागण्यात आली आहे.



ही बातमी वाचा : 


मुंबईत नोकरी पण मराठी माणसाला 'नो एन्ट्री', नोकरीच्या व्हायरल पोस्टमुळे महाराष्ट्रात संताप, ट्रोल होताच उपरती