Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil :  मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या जीवनपट उलगडणारा चित्रपट  "संघर्षयोद्धा - मनोज जरांगे पाटील" हा (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil ) प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर  लोकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. चित्रपटाच्या टीजरला चांगला प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटातील एका गाण्यासाठी अजय गोगावले याने आवाज दिला आहे. "उधळीन जीव..." हे हृदयस्पर्शी गाणं अजय गोगावलेच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे. 



मागील अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा (Marathi Reservation) प्रश्न प्रलंबित होता. त्यानंतर अनेक आंदोलने, मोर्चे झाले. काही महिन्यांपूर्वी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाचा वणवा पेटला. मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर निर्णायक आंदोलन छेडले. त्याच्या परिणामी सरकारने हालचाली करत मराठा आरक्षणावर महत्त्वाचे पाऊल उचलले. मराठा आरक्षणासाठी झटणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांचा जीवनपट आता चित्रपटात उलगडण्यात येणार आहे. येत्या 26 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 


अजय गोगावले यांच्या आवाजात गीत स्वरबद्ध


"उधळीन जीव...." या गाण्याचं लेखन वैभव देशमुख यांनी केलं असून, संगीतकार विजय नारायण गवंडे यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. तर गायक अजय गोगावले यांनी त्यांच्या भावोत्कट आवाजात हे गाणं गायलं आहे. मनोज जरांगे यांच्या व्यक्तिमत्त्वातला साधेपणा आणि समाजासाठी काही करण्याची धडपड या गाण्यात मांडण्यात आली आहे. वैभव देशमुख यांचे भावगर्भ शब्द, विजय गवंडे यांचं अंतर्मुख करणारं संगीत आणि अजय गोगावले यांचा काळजाला हात घालणारा आवाज यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल यात शंकाच नाही. चित्रपटाविषयी आधीच उत्सुकता ताणली गेली असताना आता या गाण्यानं त्यात आणखी भर पडणार आहे.


चित्रपटात कोणते कलाकार?


शिवाजी दोलताडे यांनी  "संघर्षयोद्धा - मनोज जरांगे पाटील" या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी  पार पाडली आहे. सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे , नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. 


या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे,  माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.