Actor Kishor Kadam : गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे आणि ‘कवी सौमित्र’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम (Kishor Kadam) हे सध्या एका गंभीर अडचणीत सापडले आहेत. अंधेरी, चकाला येथील त्यांचं राहत घर धोक्यात आलं असून, त्यावरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट मदतीची मागणी केली आहे.

किशोर कदम यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहून संपूर्ण प्रकार उघड केला आहे. त्यांनी आपल्या इमारतीच्या पुनर्विकासात (redevelopment) बिल्डर आणि पीएमसीच्या संगनमताने फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. "मी आणि इतर 23 रहिवासी आमच्या छताखालील सुरक्षितता गमावण्याच्या मार्गावर आहोत," असे त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले किशोर कदम? 

किशोर कदम यांनी सोशल मिडीयावर पोस्त करत म्हटले आहे की, नमस्कार! मी किशोर कदम. गेली तीस पस्तीस वर्ष प्रामुख्याने मराठी आणि हिंदी रंगमंच आणि सिनेमात काम करत असून मला महाराष्ट्रात कवी सौमित्र म्हणूनही ओळख आहे आणि या दोन्ही क्षेत्रात मला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेते ,मंत्री ,मुख्यमंत्री आणि तमाम जनतेला मी मदतीचे आवाहन करीत आहे. मेजॉरिटीच्या नावा खाली मी राहत असलेल्या सोसायटीमध्ये, रीडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेत पीएमसी आणि बिल्डर यांनी संगनमताने कमिटी सभासदांची दिशाभूल करून आणि प्रचंड गोंधळ घालून माझे आणि इतर तेवीस सभासदांची राहती घरे धोक्यात आणण्याची शक्यता निर्माण करून ठेवली आहे. कमिटी मेम्बर्सनी काही महत्वाची कागदपत्र , अर्धवट माहिती आणि लपवाछपवी करून अंधेरी पूर्व चाकाला सारख्या अत्यंत प्राईम विभागात 33(11) आणि 33(12)B या DCPR खाली आमची इमारत SRA/स्लम डेव्हेलपमेंट खाली डेव्हलप करण्याचे ठरवले असल्याचे कालच आमच्या लक्षात आले आहे.

कमिटी चौकस नसेल, सोसायटी सभासदांच्या हिताचे पाहत नसेल, PMC आणि बिल्डरच्या चुकीच्या प्रभावाखाली असेल तर सामान्य माणसांची राहती घरे एखाद्या ट्रान्झिट कॅम्प सारखी होण्याच्या शक्यता कशा निर्माण होऊ शकतात याचे उदाहरण म्हणजे आमची (अंधेरी हवा मेहेल सोसायटी चाकाला मुंबई 400093) सोसायटी आहे.

मुर्खांच्या मेजॉरिटीचा कसा गैरफायदा घेतला जाऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. सरकारने मेजॉरिटीचा कायदा करून जे लोक चौकस आहेत , कायद्याला धरून आवाज उठवतात , अन्याया विरोधात कायद्याने लढतात त्यांचा आवाजच एका अर्थाने बंद केला आहे. मेजॉरिटीच्या नावाखाली मूर्ख लोक स्वतःच्याच पायांवर धोंडे पाडून घेतात आणि हे त्यांच्या कसे लक्षातही येत नाही याचे उदाहरण म्हणजे आमची ही सोसायटी आहे.

एखादा सभासद जर चौकस असेल , कायद्याला धरून प्रश्न विचारत असेल आणि कमिटी मेम्बर्सला जर त्याच्या प्रश्नांची उत्तरे देता येत नसतील , कमिटी मेम्बर्स स्वतः काही अभ्यास न करता पँक आणि बिल्डरवर जर आंधळा विश्वास ठेऊन काम करत असतील तर त्या एका मेम्बरला गाळून वेगळा WTSAP ग्रुप स्थापन करून त्या एका मेम्बरला मुंबई सारख्या शहरात चक्क बायकॉट केले जाते , त्याच्या पासून सगळी महत्वाची माहिती लपवली जाते , त्याच्या विरुद्ध सर्व सभासदांना भरवले जाते आणि तो सभासद रिडेव्हल्पमेंटच्या विरोधात आहे असे भासवले जाते ,त्याला एकटे पाडले जाते. ही एका प्रकारची शहरी एट्रोसिटीच असते ज्या साठी कायद्यातही काहीच तरतूद नसते ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.

मुंबई सारख्या व इतर कोठेही असे सगळे घोळ झाल्या नंतर PMC आणि बिल्डर यांच्या प्रचंड आर्थिक ताकदी समोर मग वर्षानुवर्षे सामान्य माणसाला हतबलपणे लढत बसावे लागते. अशा कितीतरी केसेस आज मुंबई शहरात प्रलंबित आहेत. या गंभीर समस्येकडे शासनाला तातडीने लक्ष घालण्याची कळकळीची विनंती ,मी सर्व सामान्य माणसांतर्फे करीत आहे करीत आहे. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी, तसेच सहकारमंत्री बाबासाहेब पाटीलजी आणि महाराष्ट्रातल्या तमाम रसिक जनतेला एका कलावंताचे घर वाचवण्याचे आवाहन करीत असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

आणखी वाचा 

Prajkta Gaikwad Love Story Shambhuraj Khutwad: 'मी त्याला दादा म्हणायचे...', प्राजक्ता गायकवाडनं सांगितली तिची लव्हस्टोरी, अभिनेत्रीचं सासरं नेमकं कुठचं?