Abhijeet Khandakekar Replace Nilesh Sabale In Chala Hawa Yeu Dya Show: प्रेक्षकांना खळखळून हसवणारा मराठमोळा कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी कार्यक्रमाच्या यंदाच्या पर्वात सूत्रसंचालक निलेश साबळे (Nilesh Sabale) दिसणार नसल्याचं बोललं जात होतं. अशातच, 'चला हवा येऊ द्या'मधून सूत्रसंचालक निलेश साबळे याला डच्चू देण्यात आलायं, अशी पोस्ट राशिचक्रकार शरद उपाध्ये (Sharad Upadhye) यांनी केली आणि चर्चांना उधाण आलं. त्यानंतर मी स्वत:हून बाहेर पडलोय, असं म्हणत निलेश साबळेनं शरद उपाध्येंच्या पोस्टला स्पष्ट उत्तर दिलं. यानंतर अनेक कलाकारांनी शरद उपाध्येंचं नाव न घेता, निलेश साबळेला धीर दिलाय आणि त्याला आपला पाठींबा दर्शवलाय. अशातच आता याबाबत आणखी एक चर्चा रंगली आहे की, निलेश साबळेला या पर्वात अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandakekar) रिप्लेस करणार आहे. आता यावरही निलेश साबळेनं आपली प्रतिक्रिया दिली आहे.
निलेश साबळे बोलताना म्हणाला की, "चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वात अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालन करतोय, हे मला माहीत आहे. आमची खूप उत्तम मैत्री आहे, ती कायम राहील. अभिजीत माझ्याहीपेक्षा उत्तम सूत्रसंचालन करतो, त्यामुळे त्याला आणि टीमला माझ्या मनापासून शुभेच्छा. हा कार्यक्रम माझ्या कायम हृदयात राहील."
कार्यक्रमात दिसणार नसल्याबाबत काय म्हणाला निलेश साबळे?
'चला हवा येऊ द्या'चं सूत्रसंचालन का करणार नाही? याबाबतही निलेश साबळेनं उत्तर दिलं आहे. निलेशनं बोलताना सांगितलं की, "सध्या मी एका सिनेमाचं काम करत आहे आणि त्यात मी अडकलेलो आहे. काही वैयक्तिक अडचणीही होत्या. या चित्रपटाचं शूटींग अजून दीड महिना चालणार आहे. त्यामुळे आणि तारखा जुळत नसल्यामुळे मी स्वत:हून त्या कार्यक्रमातून माघार घेण्याची विनंती केली. याचा अर्थ असा नव्हता की मला तो कार्यक्रम करायचाच नव्हता किंवा मी स्पष्टपणे नकार दिला. मी माझ्या इच्छेनं सध्या तरी त्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. हाच निर्णय भाऊ कदम सरांनीही घेतला आहे. सध्या तेही माझ्यासोबत याच सिनेमात काम करत आहेत आणि म्हणूनच ते देखील त्या कार्यक्रमात सहभागी नाहीत. या कार्यक्रमातून आम्ही दोघंही अनुपस्थित आहोत आणि त्यामागचं खरं कारण जाणून घेण्याचा कुणी प्रयत्न केलाय का?"
शरद उपाध्येंच्या पोस्टवर निलेश साबळेंचं उत्तर
"शरद उपाध्ये सरांना पाणी द्यायचं, ही जबाबदारी माझी आहे की नाही? याचा प्रश्न मला अजूनही पडलाय. कारण तुम्हालाही आठवत असेल मी स्टेजवर होतो. तेव्हा उपाध्ये सर त्यांच्या रुममध्ये होते. माझा सराव उरकून मी प्रत्येक कलाकाराच्या रुममध्ये गेलो. त्यावेळी तुम्हाला पाणी मिळाल नाही? याला मी जबाबदार आहे का? मला अजूनही कळत नाही.", असं निलेश साबळे म्हणाले.
"निलेश साबळेंनी मला स्टेजवर जाताना स्माईल दिली नाही, असंही उपाध्ये म्हणाले. आपण त्यांचं हे वाक्य धरुयात.. आणि त्याचं दुसरं वाक्य हे की, निलेश साबळे प्रत्येक कलाकाराच्या रुममध्ये जात होते. आणि शेवटी चार वाजता ते माझ्याकडे आले. तुमच्याकडे चार वाजता आलो म्हणजे तुमच्या रुममध्ये आपला काहीतरी संवाद झालाय. मी मोठेपणा म्हणून सांगत नाही. पण जेवढे मोठे कलाकार असतात, त्यांच्या पाया पडूनच मी रुममध्ये जातो. तसंच मी शरद उपाध्ये यांच्याबद्दलही केलं. तुम्ही त्यावेळी मला आशीर्वाद दिले. कौतुकही केलं...", असं निलेश साबळे म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम का सोडला? निलेश साबळेंनी सांगितलं कारण; भाऊ कदम यांचाही तोच मुद्दा