Marathi Sahitya Sammelan : यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं (Marathi Sahitya Sammelan) सूप वाजलं असून राजधानी दिल्लीत हा सोहळा पार पडणार आहे. पण दिल्लीत होणाऱ्या या साहित्य संमेलनावरुन  पुण्यातील प्रकाशक आणि प्रकाशक परिषद यांच्यात मात्र परस्पर विरोधी भूमिका दिसत आहे. इकतच नव्हे तर भूमिका मान्य नाही. इतकचं नव्हे तर प्रकाशक परिषदेकडून बहिष्कार टाकण्याचाही इशारा देण्यात आलाय. त्यामुळे यंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे वादाच्या भोवऱ्यात अडकलं असल्याची चिन्ह सध्या दिसत आहेत. 


प्रकाशक परिषद आणि प्रकाशक संघ यांच्यामध्ये ही परस्पर विरोधी भूमिका पाहायला मिळेल. मराठी साहित्य दिल्लीत पोहचेल आणि ते तिथे वाचलं जाईल अशी भूमिका प्रकाशक परिषदेकडून घेण्यात आलीये. दुसरीकडे दिल्ली दूर असल्यामुळे प्रकाशकांचा खर्च वाढेल अशी भूमिका प्रकाशक संघाकडून घेण्यात आलीये. 


प्रकाशकांनी नफा तोट्याचा विचार करु नये - अनिल कुलकर्णी, कोषाध्यक्ष प्रकाशक परिषद


प्रकाशक परिषदेचे कोषाध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी एबीपी माझासोबत संवाद साधताना म्हटलं की, 'यंदाचं साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे, याचा आम्हाला आनंदच आहे. त्यामुळे प्रकाशकांनी यासाठी विरोध करु नये. साहित्य संमेलनामुळे दिल्लीत हे साहित्य विपुल प्रमाणात उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे साहित्य महामंडळाने ही जबाबदारी आमच्यावर सोपवली आहे, तर ती आम्ही यशस्वीरित्या पार पाडू. दिल्लीतही मराठी लोकं आहेत. तेही या संमेलनासाठी येतील. फार पुस्तकांची विक्री नाही झाली तरी त्याला उत्तम प्रतिसाद मिळेल. त्यामुळे प्रकाशकांनी नफा तोट्याचा विचार करुन नये, दिल्लीत जे काही होईल त्याचा नक्कीच फायदा होईल.' 


... अन्यथा साहित्य संमेलनावर बहिष्कार घालू - राजीव बर्वे, अध्यक्ष प्रकाशक संघ 


प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांनी यासंदर्भात एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना म्हटलं की, नागपूरपासून बेळगांवपर्यंत आणि मुंबईपासून ते गडचिरोलीपर्यंत प्रकाशकांचे आम्हाला फोन आणि मेसेज आले की, साहित्य महामंडळाने हा निर्णय चुकीचा घेतला आहे. हा निर्णय त्यांना बदलायला सांगा. तिथे साहित्य संमेलन घ्यायचं की नाही हा त्यांचा अधिकार आहे. पण मागील वर्षी हे साहित्य संमेलन अमळनेर झालं, त्याच्या आधी वर्ध्याला झालं. या दोन्ही संमेलनामध्ये पुस्तकांची विक्री फार चांगली झाली नाही. 


पुढे त्यांनी म्हटलं की, या दोन्ही साहित्य संमेलनामध्ये पुस्तकांची विक्री चांगली झाली नाही, याला कारणंही वेगळी होती, याबाबत कुणाचं दुमतंही नव्हतं. अमळनेरचं संमेलन झालं तेव्हा आम्ही निम्म भाडंही परत मागितलं. तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की, पुढच्या संमेलनात तुमची कसर भरुन काढू. पण आता त्यांनी प्रकाशकांचा काहीही विचार न करता दिल्लीत संमेलन भरवलं. 


15 ते 20 दिवसांपूर्वी आम्ही त्यांना पत्र देखील लिहिलं की, प्रकाशकांची चर्चा करुन संमेलनाचं ठिकाण ठरवू, त्यासाठी त्यांना सात ठिकाणांहून आमंत्रणही आलं होतं. परंतु अशी कोणतीही चर्चा त्यांनी केली नाही. आमच्या प्रक्रियेनुसारच आम्ही जाणार असं त्यांनी सांगितलं. हे साहित्य संमलेन दिल्लीला झालं तर पुणे ते दिल्ली प्रकाशकांचा खर्च वाढणार आहे. विक्री किती होणार यासंदर्भात कोणतीही  माहिती नाही. आम्हाला प्रवासात काही प्रमाणात सूट द्यावी आणि सूट दिली नाही तर आम्ही साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकू असा इशारा त्यांनी दिलाय.


ही बातमी वाचा : 


पहिली मंगळागौर! नाकात नथ, केसांत गजरा, हिरवा चुडा अन् नऊवारीचा थाट; स्वानंदी टीकेकरचा मराठमोळा साज