मुंबई : माजी मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांना त्यांच्या मुक्ताईनगर या मतदारसंघातून उमेदवारी न देता त्यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याबाबत खडसे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना देखील अनावर झाल्या होत्या. मात्र रोहिणी यांना तिकीट दिल्यानंतर खडसे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली असून रोहिणी यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

खडसे यांना उमेदवारी न देण्यामागची प्रमुख कारणं  ही असू शकतात 



  1.  एकनाथ खडसेंचे उपद्रवी मूल्य पक्षसंघटना आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांसाठी डोकेदुखी ठरले होते.

  2. 'विरोधी पक्ष नेता असतांना शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांचं नाव मला तरी आढळलं नव्हतं' हे खडसेंनी केलेलं ताजं वक्तव्य पक्षश्रेष्ठींच्या चांगलंच जिव्हारी लागलं होतं.

  3. खडसेंना या विधानसभेत पुन्हा संधी दिली तर पुढच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबतच्या चर्चा आणि बातम्या सतत येत राहणार, जी मुख्यमंत्र्यांसाठी डोकेदुखी ठरू शकेल.

  4. सभागृहात ऑन रेकॉर्ड खडसे सरकारचे वाभाडे काढत आणि पक्षाला सतत तोंडघशी पाडत होते.

  5. खडसेंनी सभागृहाबाहेर केलेली टीका किंवा पक्षविरोधी वक्तव्य एक वेळेस दुर्लक्षित करता आली असती पण सभागृहाच्या पटलावर काह विषय ऑन रेकॉर्ड आणणं सरकारसाठी जास्त अडचणीचे आणि नामुष्कीचे ठरत होते

  6. सर्वात महत्वाचं म्हणजे खडसेंना उमेदवारी डावलून पक्षातील इतर उपद्रवी नेत्यांना एक कडक मेसेज देण्याचा पक्षश्रेष्ठींचा प्रयत्न आहे.


एकनाथ खडसेंऐवजी रोहिणी यांना उमेदवारी, कोण आहेत रोहिणी खडसे?


संपूर्ण महाराष्ट्राचे खडसेंच्या उमेदवारीकडे लक्ष लागले होते. परंतु आपल्याला उमेदवारी मिळणार नाही, हे खडसे यांनी काल स्पष्ट केले. दरम्यान, खडसे यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी खडसे यांना अपक्ष निवडणूक लढावी, अशी मागणी केली होती. खडसे यांनी मला उमेदवारी दिली जाणार नाही. दरम्यान पक्ष मला जो आदेश देईल, मी त्याचं पालन करेन. मी पक्षाच्या प्रत्येक आदेशाचं पालन करणारा कार्यकर्ता आहे. गेल्या 42 वर्षांपासून मी ते करतोय. अनेकदा मी पक्षाचे अनेक कटू निर्णय मान्य केले आहेत, असे म्हटले होते.

गेली चाळीस वर्ष आपण पक्षाशी प्रामाणिक राहिलो. इतर पक्षातून अनेकवेळा मंत्री पदापासून वेगवेगळी प्रलोभने आपल्याला आली. मात्र आपण पक्षाची बांधिलकी कधीही सोडली नाही. हे सगळं करून झाल्यानंतर बाहेरच्यांच्या आरोपांवरून कोणतीही चूक नसताना आपल्याला तीन वर्षापासून मंत्री पदावरून दूर केलं गेलं, असे खडसे म्हणाले होते. चाळीस वर्ष आपण प्रामाणिकपणे काम करून आपल्याला का असं वागवलं गेलं, या बाबत मी माझ्या 'आकां'ना विचारणार आहे. माझा गुन्हा काय ते तरी सांगावं, असंही खडसे म्हणाले होते. वरिष्ठांना मी नक्की विचारणार की माझ्या विरोधात कुणी विष पसरवलं.  वेळ पडल्यास मी तुमच्याशी देखील संवाद साधेल, अशा शब्दात खडसे यांनी सूचक इशारा देखील दिला आहे. मला, आता तुमच्या सहकार्याची गरज आहे आणि ते तुम्ही मला द्याल हा विश्वास आहे, असे भावनिक आव्हान देखील खडसे यांनी केले होते.