मुंबई : 'शरद पवारांना पराभव समोर दिसत असून आता अपयशाचं खापर फुटू नये म्हणून ते ईव्हीएकडे बोट दाखवत आहेत', अशी प्रतिक्रिया शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी बारामतीची जागा भाजपने जिंकली तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल, असं खळबळजनक विधान केलं आहे.


बारामतीमधून शरद पवारांची कन्या आणि राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपच्या नेत्यांकडून बारामतीची जागा जिंकण्याबाबतचा विश्वास व्यक्त केला जात होता. त्याबद्दल बोलताना पवारांनी 'जर बारामती भाजपनं जिंकली तर लोकांचा निवडणुकांवरचा विश्वास उडेल', असं खळबळजनक विधान केलं आहे. त्यावर बोलताना तावडे म्हणाले, "निवडणुक आयोगानं ईव्हीएमबाबत यापूर्वीच सर्व शंका दुर केल्या आहेत. विरोधकांनी मागणी केल्याप्रमाणे सर्व ठिकाणी व्हीव्हीपॅट देखील वापरले गेले आहेत. बारामती मतदारसंघातून पवारांना मिळालेल्या माहितीनूसार ही जागा आपल्या हातातून जाऊ शकते असे त्यांना समजले असावे त्यामुळे या अपयशाचे खापर फोडण्यासाठी ईव्हीएमवर बोलायला सुरुवात केली आहे".

'काही जणांनी ईव्हीएममधील चीपमध्ये छेडछाड होऊ शकते, अशी माहिती आपल्याला दिली. गुजरात, मध्य प्रदेशात अशा प्रकारच्या घटना घडल्याचं वाचनात आलं. मात्र माझ्याकडे याबाबत खात्रीलायक माहिती नाही' असं पवारांनी म्हटलं आहे.

शरद पवार चुकीच्या माहितीवर बोलत नाहीत परंतू त्या माहितीचा आपल्याला फायदा व्हावा या पद्धतीने ते मांडतात, असं देखील तावडे म्हणाले.

शरद पवार नेमकं काय म्हणाले ?