UP Election 2022 : देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार थांबला आहे. पाचपैकी पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या चार राज्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर उद्या (7 मार्च) उत्तर प्रदेशमध्ये शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात 54 जागांवर मतदान होत असून, 613 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या टप्प्यात नक्षलग्रस्त चकिया, दूधी आणि रॉबर्टसगंज जागांवरही मतदान होणार आहे. या जागांवर सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यामुळे या जागांवर मतदानाच्या 48 तास अगोदर शनिवारी दुपारी 4 वाजेपर्यंत निवडणूक प्रचार सुरू होता. इतर जागांवर सायंकाळी सहा वाजेपर्यंत निवडणूक प्रचार सुरु होता.


अंतिम फेरीत किती उमेदवार आणि किती मतदार आहेत


प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप, समाजवादी पार्टी, बसपा आणि काँग्रेसच्या दिग्गजांनी जोरदार प्रचार केला. सातव्या टप्प्यासाठी एकूण 2 कोटी 6 लाख मतदार आहेत. यामध्ये 1 कोटी 10 लाख पुरुष आणि 96 लाख महिला मतदार आहेत. या फेरीत 1 हजार 17 तृतीयपंथी मतदारही आहेत. हे मतदार 613 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.


विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या फेरीत आझमगड, वाराणसी आणि विंध्याचल मंडलातील 9 जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. आझमगड, मऊ, जौनपूर, गाझीपूर, चंदौली, वाराणसी, चंदौली, मिर्झापूर, भदोही आणि सोनभद्र जिल्ह्यात मतदान होणार आहे. सातव्या टप्प्यात मतदान होणाऱ्या या 54 जागांपैकी 2017 च्या निवडणुकीत भाजपने 29 जागा  जिंकल्या होत्या. तर 11 जागा समाजवादी पार्टीने, 6 जागा बसपाने, आणि निषाद पार्टीने एक जागा जिंकली होती. 


योगी आदित्यनाथ सरकारमधील मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला 


या टप्प्यात योगी आदित्यनाथ सरकारच्या 7 मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये मागासवर्गीय कल्याण मंत्री अनिल राजभर, मुद्रांक आणि नोंदणी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) रवींद्र जैस्वाल, पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री (स्वतंत्र प्रभार) नीलकंठ तिवारी, गृहनिर्माण आणि नगर नियोजन मंत्री गिरीश यादव, ऊर्जा राज्यमंत्री रमाशंकर सिंह पटेल यांचा समावेश आहे. तसेच सहकार राज्यमंत्री संगीता यादव बळवंत, राज्यमंत्री संजीव गोंड सोनभद्र, वन व पर्यावरण विभागाचे कॅबिनेट मंत्री दारा सिंह चौहान यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.


दुसरीकडे, दुर्गा प्रसाद यादव सलग 9 व्यांदा विधानसभेत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आझमगड जागेवरून समाजवादी पार्टीचे उमेदवार आहेत. या टप्प्यात तीन उमेदवार सलग पाचव्यांदा विधानसभेत जाण्यासाठी निवडणूक लढवत आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपचा मित्रपक्ष असलेला सुहेलदेव भारतीय समाज पक्ष यावेळी समाजवादी पक्षासोबत आहे. सुभासपचे प्रमुख ओमप्रकाश राजभर हे गाझीपूरच्या जहूराबाद मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या: