मुंबई : महायुतीतील जागावाटपावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'जागा दाखवली' या वाक्प्रचाराचा आधार घेत भाजपला टोला हाणला, तर मित्रपक्षांना चिमटे काढले. महायुतीतले मित्रपक्ष कमळाच्या चिन्हावर का लढत आहेत, असा सवाल पत्रकारांनी केला असता उद्धव ठाकरेंनी सूचक टोला लगावला. वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (4 ऑक्टोबर) संयुक्त पत्रकार परिषदेत महायुतीचा फॉर्म्युला जाहीर केला. त्यानुसार भाजप 150, शिवसेना 124 तर मित्रपक्ष 14 जागांवर लढणार आहे. पण प्रत्यक्षात रासपचे दोन उमेदवार वगळता 162 उमेदवार हे कमळाच्याच चिन्हावर लढणार आहेत.

याविषयी विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपने त्यांच्या वाट्याला आलेल्या जागांचं काय करायचं, मित्रपक्षांना कोणती जागा दाखवायची म्हणजे कोणती जागा द्यायची, अशी कोटी करत उद्धव ठाकरेंनी रामदास आठवले, सदाभाऊ खोत, महादेव जानकर आणि विनायक मेटे यांचं नाव न घेता खोचक टोला लगावला.

आठवले, खोत काय म्हणाले?
उद्धव ठाकरेंनी हाणलेल्या टोल्यानंतर महायुतीत अपेक्षित जागा मिळाल्या नसल्याची खंत रामदास आठवले यांनी बोलून दाखवली. इतकंच नाही तर अन्याय सहन करण्याची सवय झाल्याचंही आठवले म्हणाले. तर मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षांचा योग्य सन्मान राखल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.