सातारा : "या सरकारने देशातल्या राजांना भिक मागायला लावली, त्यांच्या हातात पाच वर्षात हातात वाडगं दिलं", अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी शिवसेना-भाजप सरकारवर टीका केली आहे. सातारा येथील प्रचारसभेत ते बोलत होते.


यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेलाही उदयनराजेंनी उत्तर दिलं आहे. 'तुम्ही निधी दिला परंतू मी त्याचा पाठपुरावा केला म्हणून तुम्ही कामं केली' अशा शब्दात उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर दिले. "या सरकारने देशातल्या राजांना भिक मागायला लावली, त्यांच्या हातात पाच वर्षात हातात वाडगं दिलं. गरिबांचं उदरनिर्वाहाचं साधनसुद्धा हिरावून घेतलं. तसेच निवडणुका लागल्या की यांच्याकडे भरभरुन पैसे असतात. आमच्या गाड्या चेक केल्या तर शिळ्या भाकरी मिळतील. परंतू तुम्हाला ज्या गाडीवर कमळ दिसेल त्या गाडीत मी तुम्हाला पैसे शोधुन देतो", असंही उदयनराजे म्हणाले.

'मुक मोर्चाला 'मूका मोर्चा' म्हणणाऱ्यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी. ही तुमची संस्कृती आहे का?' असा सवाल उदयनराजेंनी शिवसेनेला केला. उदयनराजेंनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचीही खिल्ली उडवली. 'लोकांसमोर जाताना आती ही लोकं लटलट कापतायत. भाषण करताना डायसचा आधार नसेल तर ते खाली पडतील', अशा शब्दात उदयनराजेंनी नरेंद्र पाटलांचा समाचार घेतला.