ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता, मतदान केंद्रांजवळील इंटरनेट सेवा बंद करा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
एबीपी माझा वेब टीम | 20 Oct 2019 06:34 PM (IST)
मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत प्रत्येक पोलिंग बुथ व स्ट्राँग रुम्सच्या 3 कि.मी. परिसरातील इंटरनेट सेवा बंद ठेवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस ने Election Commission राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुक आयोगाकडे केली आहे.
मुंबई : ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट उपकरणे इंटरनेटद्वारे हॅक होण्याची शक्यता लक्षात घेता निवडणूक प्रक्रियेत मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत प्रत्येक पोलिंग बुथ व स्ट्राँग रुम्सच्या 3 कि.मी. परिसरातील इंटरनेट सेवा बंद ठेवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस ने Election Commission राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुक आयोगाकडे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी 20 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाला पत्राद्वारे विनंती केली आहे. या पत्रात त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सुमारे ८ कोटींपेक्षा अधिक मतदार मतदान करणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. निवडणुकीत मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट उपकरणांच्या माध्यमातून होत आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट हॅक होऊन इच्छा नसलेल्या उमेदवारांनाच मते जाण्याची शक्यता आहे. मोबाईल इंटरनेटच्या माध्यमांतून हॅकर्सकडून ही उपकरणे हॅक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही शक्यता टाळण्यासाठी २१ ते २४ ऑक्टोबर या चार दिवसांच्या काळात मतदान केंद्रे आणि स्ट्राँगरुमच्या ३ किमी परिसरात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात यावी. महाराष्ट्राबरोबरच हरयाणामध्ये देखील मतदानाच्या काळात याच पद्धतीने इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात यावी अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.