Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच यंदाची निवडणूक (Elections) भाजप (BJP) विरोधात स्थापन झालेली महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादीत (NCP) फूट पडून स्थापन झालेली महायुती यामुळे अत्यंत चुरशीची ठरणार आहे. ठाकरे गटाकडून (Thackeray Group) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. ठाकरेंचं लक्ष मुंबईकडे (Mumbai News) असून मुंबईतील सहापैकी चार जागांसाठी ठाकरे गट आग्रही असल्याचंही बोललं जात आहे. लोकसभेसाठी दक्षिण मुंबई (South Mumbai) आणि उत्तर पश्चिम मुंबईसाठी (North West Mumbai) नावांची निश्चिती ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. मात्र, ईशान्य (North East Mumbai) मुंबईसाठी कोण? हे मात्र ठाकरेंचं ठरत नव्हतं. ईशान्य मुंबईतून संजय राऊत (Sanjay Raut) नाहीतर संजय दीना पाटील (Sanjay Dina Patil) यांच्या नाावाची ठाकरे गटाकडून निश्चिती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. 


ईशान्य मुंबईत सध्याचे ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या नावाचीही चर्चा होती. संजय राऊत यंदा लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु, आता ठाकरेंनी या चर्चांना पूर्णविराम देत संजय दीना पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं बोललं जात आहे. संजय दीना पाटील हे 2004 साली आमदार राहिले आहेत तर 2009 ला खासदार होते. तसेच, काही वर्षांपूर्वी संजय दीना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. 




दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबईसाठी ठाकरेंचे शिलेदार ठरले


महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट सामील आहे. तसेच, आगामी लोकसभा निवडणूक एकत्रच लढवणार असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात आहे. अद्याप महाविकास आघाडीचा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. तरीदेखील मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांमधून निवडणूक लढवण्यासाठी ठाकरे गट आग्रही असल्याचं बोललं जात आहे. ठाकरेंनी त्यासाठी चाचपणीही सुरू केली आहे. दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईसाठी ठाकरेंनी नावांची निश्चितीही केली असल्याचं बोललं जात आहे. 


ईशान्य मुंबईसाठी ठाकरेंची नवी रणनीती, संजय दीना पाटलांना उतरवणार रिंगणात? 


मुंबईतील दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई या चार लोकसभांच्या जागांसाठी ठाकरे गट आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये दक्षिण मुंबईसाठी विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि उत्तर पश्चिम लोकसभेच्या जागेसाठी अमोल किर्तीकर यांना ठाकरे गटाकडून हिरवा कंदील देण्यात आला आहे. तर ईशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या लोकसभेच्या जागेसाठी ठाकरे गटाची चाचपणी सुरू होती. परंतु, आता ठाकरेंनी संजय दीना पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब करत ईशान्य मुंबईचा प्रश्नही निकाली काढला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


ईशान्य मुंबई लोकसभेची जागा ही सेना भाजप युतीमध्ये भाजपसाठी देण्यात आली होती. जिथे भाजपचे खासदार मनोज कोटक आहेत. त्यांच्याविरोधात तगडा उमेदवाराच्या शोधात ठाकरे गट गेल्या अनेक दिवसांपासून होता. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मराठी मतदार मोठ्या संख्येनं आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या नावाची देखील चर्चा लोकसभेच्या उमेदवारीसाठी होती. मात्र यावर कुठलाही निर्णय घेण्यात आला नव्हता. पण आता राऊतांच्या चर्चांना पूर्णविराम देत ठाकरेंनी नवा शिलेदार मैदानात उतरवल्याचं बोललं जात आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


आगामी लोकसभेसाठी 4-1-1 असा मविआचा फॉर्मुला? मुंबईतील सहापैकी चार जागांवर ठाकरे गट आग्रही, कशी असेल रणनीती?