एकेकाळी कम्युनिस्टांचा गड असणारा तिवसा मतदार संघ हा अमरावती जिल्ह्यातील मेळघाटनंतर सर्वात मोठा मतदार संघ आहे. 2009 साली काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदार संघात काँग्रेसचा झेंडा फडकाऊन या मतदार संघावर असणाऱ्या भाजपच्या वर्चस्वाला छेद दिला. 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेतही यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदार संघात आपलं वर्चस्व कायम ठेवलं. विशेष म्हणजे 2014 च्या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांच्या सख्ख्या बहिनेचं त्यांच्याविरोधात बंड पुकारून उमेदवार म्हणून आव्हान दिलं होतं. दोन बहिणींच्या या भांडणात यशोमती ठाकूर यांचा पराभव निश्चित आहे, असं वाटत असतानाच तिवस्याच्या मतदारांनी यशोमती ठाकूर यांना पुन्हा एक संधी दिली. 2014 च्या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांनी 58 हजार 808 मते घेऊन विदर्भात एकमेव काँग्रेस उमेदवार म्हणून विजयी होण्याचा मान मिळविला. त्यांच्या विरोधक भाजपच्या निवेदिता चौधरी यांना 38 हजार 367 मतं मिळाली होती. तर शिवसेनेचे दिनेश वानखडे याना 29 हजार मतं मिळाली होती.


तिवसा मतदार संघात मोर्शी, चांदुर बाजार, चांदुर रेल्वे, भातकुली आणि अमरावती तालुक्यातील काही गावे येतात. तिवसा मतदार संघात 2014 ला भाजपने निवेदिता चौधरी यांना उमेदवारी दिल्याने भाजपचे माजी आमदार साहेबराव तट्टे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून निवडणूक लढवली आणि शिवसेनेचे दिनेश वानखडे हे सुद्धा मैदानात होते. साहेबराव तट्टे  यांच्यामुळे भाजपची मतं विभागली गेली. शिवसैनिकांनी दिनेश वानखडे यांच्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. मोदी लाट सर्वत्र असताना यशोमती ठाकूर यांच्या विजयी घोडदौडीवर याचा कुठलाही परिणाम झाला नाही.


आज यशोमती ठाकूर नुसत्या आमदार नाही तर काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आहेत.. भाजपने महाजनादेश यात्रा ही यशोमती ठाकूर यांच्या मतदार संघात असणाऱ्या गुरुकुंज मोझरी येथून काढली. या यात्रेमुळे यशोमती ठाकूर यांना यावेळी घरी बसवू असा संदेश देण्याचा प्रयत्न झाला असतानाच यशोमती ठाकूर या विदर्भातील काँग्रेसच्या एकमेव महिला आमदार किती पावरफुल आहेत हा सुद्धा संदेश सर्वत्र गेला आहे.

2019 च्या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांना पराभूत करण्यासाठी निवेदिता चौधरी कामाला लागल्या असतानाच भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सूर्यवंशी हे सुद्धा उमेदवारी मिळावी म्हणून जीवाचं रान करीत आहेत. उमेदवारीवरून भाजपात गत निडणुकीसारखी गटबाजी यावेळीही होण्याची शक्यता आहे.  भाजप-सेनेची युती झाली आणि युतीचा उमेदवार तगडा असला तर तिवसा मतदार संघात चुरशीची लढत पाहायला मिळेल. आज मात्र यशोमती ठाकूर यांची बाजू सध्यातरी तगडी आहे.


काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या राजकारणाचा राज्यभर दबदबा असला तरी ज्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये त्याचं मतदान आहे, त्याच जिल्हा परिषद सर्कलमध्ये मात्र यशोमती ठाकूर यांचा उमेदवारांना गेली पंधरा वर्षे पराभव पत्करावा लागत आहे. आता विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी ही तिवसा मतदार संघासाठी होताना दिसत आहे. परंतु काँग्रेसकडून फक्त यशोमती ठाकूर यांची उमेदवारी निश्चित आहे असं मानलं जात असलं तरी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांचाही जनसंपर्क वलगाव आणि भातकुली परिसरात चांगला आहे. ते ही काँग्रेसच्या तिकिटावर लढण्यासाठी आग्रही आहेत. परंतु त्यांना काँग्रेसचं तिकीट मिळणं अवघड असलं तरी ते ही निवडणूक अपक्ष लढू शकतात. ते अपक्ष लढल्यास त्यांना खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मदत करू शकतात. कारण लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रकाश साबळे यांनी नवनीत राणांसाठी मेहनत घेतली होती. त्यामुळे प्रकाश साबळे यांना राणांकडून रसद मिळू शकते.