मुंबई : शरद पवार यांनी निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असं आवाहन नातू रोहित पवार यांनी केलं आहे. रोहित पवार यांनी एका भावनिक फेसबुक पोस्टद्वारे शरद पवारांना निर्णयाचा पुनर्विचार करावा, असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांचे पुत्र आणि नातू पार्थ पवार यांनी निवडणूक लढवावी, यासाठी शरद पवारांनी माढ्यातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.


फेसबुक पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात, "राजकारणातले मोठमोठ्ठे लोक साहेबांच्या राजकारणाचा गौरव करत असताना काय म्हणतात हे आपणाला माहितच आहे पण सर्वसामान्य लोकं काय म्हणतात याकडे पवार साहेब नेहमीच लक्ष देतात. म्हणूनच गेली 52 वर्ष फक्त राजकारणच नाही तर समाजकारणात देखील हिच एकमेव व्यक्ती आमच्यासाठी उभा राहू शकते अस सर्वसामान्य माणसांच मत आहे.

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या सहवासातून सुरू झालेला साहेबांचा हा प्रवास भेदभावाचं, जातीधर्माचं राजकारण न करता, गेली 52 वर्ष न थकता सर्वसामान्यांसाठी सुरु आहे, म्हणूनच पवार साहेबांच राजकारण कोणत्या हवेवर नाही तर सर्वसामान्यांच्या घरातून चालू होतं. हे मला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या दिवशीच अभिमानाने सांगू वाटतं.

शरद पवार यांची माढा मतदारसंघातून माघार


एक कार्यकर्ता म्हणून,
“साहेबांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर हा असणारच आहे, पण या आदरच्या पुढे प्रेम असतं. आणि माझं आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच प्रेम म्हणून आमच्या प्रत्येकाच हेच मत आहे की, साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करा.”

बाकी राहता राहिला हवेतून पदावर बसलेल्या लोकांचा विषय तर साहेबांबद्दलचं आपलं वक्तव्य हे शेवटच असू द्या, तसंही बेडकासारखं हवा भरुन बैल होण्याच्या नादात आपण फुटणार होताच. पण अशी वक्तव्य करत राहिलात तर हवा भरण्याच्या आतच फुटाल."

रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट



कार्यकर्ता म्हणून पोस्ट : रोहित पवार
नातू म्हणून बोलण्यापेक्षा, पवारांचा, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून ती पोस्ट लिहिली. साहेबांवर, त्यांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या माझ्यासह असंख्य कार्यकर्त्यांची हीच भावना आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

पवारांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर विरोधकांनी केलेल्या टीकेवर रोहित पवार म्हणाले की, "पवारांनी याआधी कितीतरी निवडणुका लढवल्या आहेत. पवारांयाविरोधात बोललं तर मोठे झालो, असं अनेकांना वाटतं. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवारांच्या निर्णयावरुन राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत."

राष्ट्रवादीने पार्थला किंवा कोणत्याही उमेदवाराला तिकीट दिलं, तर त्यांना निवडून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, असंही रोहित पवार यांनी सांगितलं. तसंच मी लोकसभेसाठी कधीही इच्छुक नव्हतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पवार कुटुंब काल, आज, उद्या कधीही वेगळं होणार नाही, ते एकत्रित आहे. मतभेदाच्या बातम्यांमध्ये अर्थ नाही. काही जणांकडून फूट पाडायचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही एकत्रित बसून निर्णय घेतो. कुटुंबाची ताकद ही एकीची ताकद असून ती कायम राहिल, असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.

पार्थ आधी माझा भाऊ आहे, आजही भाऊ आहे, उद्याही राहिल. निवडणूक लढल्यास, त्याला मतं मिळाली तर सगळ्यांनाच त्याचा अभिमान असेल. आज काम करताना एकटा रोहित पवार नाही तर पार्थ, अजित पवार साहेब लागतील. ते एकत्रित राहिल्यावर शक्य होईल.

तसंच मी लोकसभेसाठी इच्छुक नव्हतो, असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं. लोकांमध्ये फिरताना त्यांच्यासोबत चांगलं नातं तयार झालं. संवादाच्या माध्यमातून सामाजिक बदल करण्याचा प्रयत्न करत असल्याचं पवार म्हणाले.



संबंधित बातम्या :

सुजय विखे पाटील भाजपच्या वाटेवर, तर राधाकृष्ण विखे पाटील...

आघाडीतील अहमदनगरचा तिढा सोडवण्यासाठी राहुल गांधी मध्यस्थी करणार

सुजय विखे पाटील राष्ट्रवादीकडून अहमदनगर लोकसभेची जागा लढवणार?