पुणे : भाजपचा कुठलाही नेता इथं आला की माझं नाव घेतात. मला वाटतं की झोपेत होता माझं नाव घेत असतील. लोकांच्या समोर प्रश्न आहेत शेतीचं नोकऱ्यांचा, शेतकरी आत्महत्या आणि त्यांच्या अनेक समस्या आहेत मात्र सत्ताधाऱ्यांच्या भाषणात 370 या मुद्द्यावरच जोर असतो. पुलवामाचा बदला हवाईदलाच्या सैनिकांनी घेतला मात्र क्रेडिट कुणी यांनी घेतले.  'करुन गेलं गाव आणि भलत्याचंच नाव अशी सध्याची भाजपाची परिस्थिती आहे अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. पुणे जिल्ह्यातील शिरुर मतदारसंघात उरळी कांचन येथील सभेत ते बोलत होते.


गुजरातचे एक भलेमोठे गृहस्थ महाराष्ट्रात फिरत आहेत. त्यांनी अनेकदा जेलवारीही केली आहे. मी निवडणूक लढवत नाही तरी यांच्या तोंडात माझेच नाव आहे. हे लोक निवडणूक शरद पवार या एका नावावरच लढवत आहेत, अशा शब्दात अमित शाह यांचे नाव न घेता  पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला.

पवार पुढे म्हणाले की, पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला त्याचा बदला घेण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येवून दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र श्रेय मोदी घेण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोपही  पवार यांनी केला.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात अनेक कारखाने आले, एमआयडीसी आल्या. अनेक युवकांना नोकर्‍या मिळाल्या परंतु आता काय?, शेतकऱ्याच्या कुटुंबातील एकाने काहीतरी दुसरा व्यवसाय केला पाहिजे जेणेकरून कुटुंब नीट चालेल, असा सल्लाही त्यांनी दिला. कुणी मुद्याचे बोलतच नाही.  महागाईवर बोला, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला, आत्महत्यांवर बोला, ढासळत्या अर्थव्यवस्थेवर बोला, मात्र या विषयांवर बोललं जात नाही, असेही ते म्हणाले.

आघाडी सरकार असताना शिरूर भागात कारखानदारी आणली गेली. हे काही फडणवीस सरकारच्या काळात झालेली कामं नाहीत. मात्र आज अवस्था काय आहे ? पिंपरी-चिंचवड येथे मुलांना नोकऱ्यांमधून काढून टाकत आहेत. याला सरकार जबाबदार आहे. परिस्थिती सांभाळण्याची क्षमता यांच्यात नाही असा आरोपही पवार यांनी केला.

अनेक जण आज पक्ष सोडून जात आहे. पक्षात रहायचे की नाही हे ज्याचे त्याचे मत आहे. सोबत आले तर बरं आहे. नाही आले तर दुखवट्याचा ठराव मांडून पुढे जायचं असेही पवार म्हणाले.