Ramdas Athawale on Mahayuti Seat Sharing: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) रणधुमाळी पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी केवळ काहीच दिवस शिल्लक आहेत. मात्र, रामदास आठवलेंचा (Ramdas Aathvale) पक्ष आरपीआयला (RPI) महायुतीकडून (Mahayuti) अद्याप एकही जागा मिळालेली नाही. यावरुन पक्षप्रमुख रामदास आठवले नाराज असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत चर्चा केली असून त्यासंदर्भात त्यांनी पत्रही दिल्याचं त्यांनी सांगितलं.

  


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा महाआघाडीचा एक भाग आहे आणि रामदास आठवले हे केंद्रात मंत्रीही आहेत. मात्र, राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं आरपीआयकडे दुर्लक्ष केल्यानं ते नाराज असल्याचं दिसून येत आहे. याबाबत रामदास आठवले म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाला एकही जागा मिळत नाही. हा प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आता आम्ही देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून सांगितलं आहे की, जेव्हा जेव्हा जागावाटपाबाबत चर्चा होते, तेव्हा आम्हाला एकदाही बोलावलं गेलं नाही.




रामदादा आठवलेंनी पाठवलेली 21 जागांची यादी


रामदास आठवले पुढे बोलताना म्हणाले की, "आम्ही 21 जागांची यादी चंद्रकांत बावनकुळेंना दिली होती, त्यापैकी चार-पाच जागा आरपीआयला देण्याचा निर्णय व्हायला हवा होता. आता फक्त दोन-तीन जागा उरल्या आहेत. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोन ते तीन दिवस बाकी आहेत आणि अद्यापही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला एकही जागा मिळालेली नाही, हा आमच्या पक्षासाठी आणि समाजासाठी मोठा धक्का आहे. 


RPI ला भाजच्या कोट्यातून जागा मिळणार?


आरपीआय प्रमुख रामदास आठवले म्हणाले की, महायुतीच्या नेत्यांनी RPI कडे एवढं दुर्लक्ष करणं अजिबात योग्य नाही आणि यासाठीच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी विश्वास दिला होता की, भाजपच्या कोट्यातून एक जागा आरपीआयला देण्यात येईल. तसेच, आरपीआयला विधानपरिषदेची जागा दिली जाणार असल्याचं आश्वासनही त्यांना दिलं होतं. पण आतापर्यंतच्या जागावाटपात आम्हाला एकदाही चर्चेसाठी बोलावलं नव्हतं. 


RPI नेहमी महायुतीसोबत... 


रामदास आठवले यांनी महायुतीसोबत काडीमोड घेण्याबाबतच्या प्रश्नावर स्पष्ट वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, आरपीआय नेहमीच एनडीएसोबत आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात देश विकास करतोय. दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांकांसह सर्वच वर्गांसाठी काम केलं जातंय. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी एनडीए आणि महायुतीसोबत आहे.


महायुतीच्या किती जागांवर उमेदवारांची घोषणा...? 


महायुतीच्या जागावाटपाचा तिढा जवळपास सुटल्यात जमा असल्याचं बोललं जात आहे. आतापर्यंत भाजपनं 121 उमेदवारांची घोषणा केली आहे. तर, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 65 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 49 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत.म्हणजेच, आतापर्यंत एकूण 235 जागांवर महायुतीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, आतापर्यंत 53 जागांवरील उमेदवारांची घोषणा होणं बाकी आहे. 


दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या वेळापत्रकानुसार, राज्यातील एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.