मुंबई : मी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढावी, अशी येथील जनतेची भावना आहे. शिवसेनेलाही असं वाटत आहे, मात्र ज्यांना वाटावं त्या भाजपला मी ईशान्य मुंबईतून लढावं असं अजून वाटत नाही, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.


भाजपला वाटतं मी दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढावी तर शिवसेनेला वाटतं मी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढावी. मात्र या दोन्ही जागांपैकी एक जागा तरी रिपब्लिकन पक्षाला मिळावी, अशी अपेक्षा  आठवले यांनी व्यक्त केली. घाटकोपर पूर्व कामराज नगर येथे आयोजित सभेत आठवले बोलत होते.

यावेळी त्यांनी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर देखील टीका केली. कामराज नगर मधील जनता विकास कामांपासून वंचित आहे. त्यांच्या प्रश्नांकडे स्थानिक खासदार किरीट सोमय्या लक्ष देत नाहीत. पाच वर्षांत आमचा खासदार आम्हाला दिसलाच नाही, अशी नाराजी  शिवसेना नगरसेवक परमेश्वर कदम यांनी माझ्याकडे व्यक्त केली, असे आठवले म्हणाले.

आठवले म्हणाले की, इथे शिवसेना-भाजप असा वाद करू नका. आता शिवसेना-भाजप युती झाली आहे. आम्ही शिवसेना-भाजप दोन्ही पक्षांच्या युती सोबत आहोत. आम्हाला लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांनी प्रत्येकी एक जागा सोडली पाहिजे. शिवसेना नगरसेवकांना आणि  ईशान्य मुंबईतील अनेक कार्यकर्त्यांना मी ईशान्य मुंबईतून  लोकसभा निवडणूक लढावी असे वाटते मात्र ज्यांना ( भाजपला) असं वाटायला पाहिजे त्यांना अजून वाटत नाही अशी खंत आठवले यांनी बोलून दाखवली.

दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई दोन्हीपैकी कोणत्याही मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढण्याची आपली तयारी आहे. एकही मतदार संघ रिपाइंला नाही सुटला तरी मी राज्यसभेवर आहे, असे ते म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीए सरकारचाच विजय होणार असून गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मला केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद निश्चित मिळेल असा विश्वास देखील रामदास आठवले यांनी व्यक्त केला.