औरंगाबाद : शिवसेना भाजप यांच्या युतीचं घोंगडं अजूनही भिजतच आहे. दोन्ही पक्षांमधून कधी स्वबळाची भाषा होते, तर पडद्यामागे एकमेकांना चुचकारण्याचे प्रयत्न होताना दिसतात. शिवसेना भाजपने 50-50 या जागावाटपाच्या सूत्राने युती केली, तर मराठवाड्यातील चित्र काय असेल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.


मराठवाड्यामध्ये शिवसेनेची ताकद औरंगाबाद, जालना, परभणी, बीडचा एक मतदारसंघ आणि थोडीबहुत नांदेडमध्ये आहे.
भाजप-शिवसेना युतीचा 50-50 चा फॉर्म्युला मराठवाड्यातील काही जागांवर मात्र नवेच वाद निर्माण करणारा आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघावर शिवसेना दावा सांगू शकते. तर बीडमधील गेवराईत विद्यमान आमदार भाजपचे असले तरी बदामराव पंडित शिवसेनेत गेल्यामुळे सेनाही या जागेसाठी आग्रह धरु शकते.

बीडमध्ये परंपरागत बीड आणि गेवराई अशा दोन जागांवर शिवसेनेने दावा केला, तर मात्र भाजपची गणिते बिघडणार आहेत.
नांदेडमधील शिवसेना आमदार हेमंत पाटील यांच्या मतदारसंघात भाजप दावा करु शकते.

लातूरमधील औसा मतदारसंघ शिवसेनेचा आहे तिथे मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार नशीब आजमावून पाहण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

जालना जिल्ह्यातील बदनापूर विधासभा मतदारसंघ परंपरेप्रमाणे शिवसेनेच्या ताब्यात होता. मात्र 2014 साली शिवसेना भाजप वेगवेगळी लढली, तेव्हा भाजपने बाजी मारुन सेनेच्या ताब्यातली जागा आपल्याकडे खेचण्यात यश मिळवलं.