बीड : चंद्रकांत पाटलांचा स्वतःचा असा मतदारसंघ नाही. पण जर चंद्रकांत पाटलांनी ग्रामीण भागात दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवली तर मग मात्र मी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढणार असे राजू शेट्टी यांनी ठणकावले आहे. भविष्यात चंद्रकांत पाटील विरुद्ध राजू शेट्टी असा संघर्ष होऊ शकतो असे संकेत शेट्टी यांनी दिलेत..


बीडच्या आपेगाव मध्ये शेतकरी मेळाव्यासाठी आलेल्या राजू शेट्टी यांनी एबीपी माझाशी बोलताना चंद्रकांत पाटील यांना आव्हान दिले आहे.  यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणूक स्वाभिमानी पक्ष लढवणार आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मतविभाजन टाळण्यासाठी सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडी निर्माण करावी अशीच भूमिका स्वाभिमानी संघटनेची आहे असा या वेळी शेट्टी म्हणाले.

याबरोबरच या महाआघाडीमध्ये बहुजन वंचित आघाडीनं सुद्धा यावं असेही शेट्टी यावेळी म्हणाले. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचा पराभव डोळ्यासमोर ठेवून अशी रणनीती आखण्याची गरज असल्याचं यावेळी शेट्टी म्हणाले.

खरंतर यापूर्वी राजू शेट्टी आणि दोन वेळा लोकसभेची निवडणूक लढवली होती.  विधानसभा निवडणूक लढवण्याचा डोक्यात नाही असा निर्वाळा देतानाच जर चंद्रकांत पाटील इतर कुणाच्या मतदारसंघातून उभारणार असतील तर मात्र मी सुद्धा उभा राहीन असे यावेळी राजू शेट्टी म्हणाले. त्यामुळे आगामी काळात चंद्रकांत पाटील विरुद्ध राजू शेट्टी असा संघर्ष विधानसभेमध्ये पाहायला मिळू शकतो असे सूतोवाच सुद्धा राजू शेट्टी यांनी केलं आहे.