मुंबई : "राज ठाकरेंनी मुंबईतील सभेत दाखवलेला चिले कुटुंबाचा फोटो भाजपच्या किंवा सरकारच्या अधिकृत जाहिरातीमधला नाही. मात्र, अशा पद्धतीने फोटो वापरणं हे चुकीचंच आहे," अशी प्रतिक्रिया राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.


'मोदी है तो मुमकीन है' म्हणणाऱ्या एका योजनेच्या जाहिरातीसाठी भाजपने वापरलेल्या फोटोतील कुटुंबाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या (23 एप्रिल) सभेत मंचावर आणलं होतं. खोट्या प्रचारासाठी भाजपच्या आयटी सेलच्या लावारीस कारट्यांनी या कुटुंबाच्या घरगुती फोटोचा वापर केल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.

'आम्ही कशी गरिबी हटवली याचा प्रचार भाजपने केला. अशा किती कुटुंबीयांचा वापर केला असेल, किती खोटा प्रचार करणार तुम्ही?' असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. हरसाल या डिजीटल गावाची कथित पोलखोल केल्यानंतर राज ठाकरेंनी पुन्हा भाजपवर खोट्या प्रचाराचा आरोप केला आहे.

यावर विनोद तावडे म्हणाले की, राज ठाकरेंनी सभेत दाखवलेला चिले कुटुंबाचा फोटो भाजपच्या किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीतला नाही. तो फोटो कोणत्याही अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध झालेला नाही. कदाचित हा फोटो एखाद्या मोदीप्रेमीने सोशल मीडियावर पोस्ट केला असू शकतो. मात्र, अशा पद्धतीने फोटो वापरणं हे चुकीचंच आहे.

"अशाप्रकारे जाहिरातीत फोटो वापरल्याचं आमच्या लक्षात आलं, हे चिले कुटुंबातील सदस्यांनी स्वत:हून सांगितलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी स्वत:हून काहीतरी शोधून काढलं वगैरे असा आव आणू नये," असंही विनोद तावडे म्हणाले.

VIDEO | राज ठाकरेंच्या मंचावर आलेल्या 'मोदी है तो मुमकीन है'मधील कुटुंबाशी बातचीत



डीलिंगनुसार स्क्रिप्टमधलं अॅडिशन
शरद पवारांसोबतच्या गाठीभेटी आणि मोदी-शाह जोडीवरील प्रहार, यामुळे राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट बारामतीहून येत असल्याचा आरोप भाजप सातत्याने करत आहे. शिवाय काळाचौकीमधील कालच्या सभेत राज ठाकरेंनी थेट शिवसेनेलाही मतदान न करण्याचं आवाहन केलं. याबाबत विनोद तावडेंनी राज ठाकरेंना टोला लगावला. "राज ठाकरेंनी आता भाजपच्या मित्रपक्षाचं म्हणजेच शिवसेनेचं नाव सभेतून घ्यायला सुरुवात केली आहे. गेले दोन दिवस जो गॅप घेतला, त्यात झालेल्या डीलिंगनुसार स्क्रिप्टमधलं हे अॅडिशन असावं, असं विनोद तावडे उपहासाने म्हणाले.

स्टॅण्डअप कॉमेडी सुरु ठेवायला हरकत नाही
राज ठाकरे यांच्या सभांना सध्या तुफान प्रतिसाद मिळत आहे. या सभांमध्ये मोदींनी केलेल्या घोषणांच्या, आश्वासनांच्या व्हिडीओ क्लिप दाखवून राज ठाकरे भाजपवर अक्षरश: तुटून पडले आहेत. मात्र त्यांच्या सभा भाजपला चांगल्याच बोचल्याचं चित्र आहे. त्यांच्या सभांविषयी विनोद तावडे म्हणाले की, "राज ठाकरेंना 27 एप्रिलनंतरही सभा कंटिन्यू करावी, अशी आमची विनंती आहे. कारण या टुरिंग टॉकीजमुळे जनतेची चांगली करमणूक होत आहे. तसंही राज ठाकरेंचा एकही उमेदवार निवडणूक लढवत नाही. त्यामुळे राज ठाकरेंना त्यांची स्टॅण्डअप कॉमेडी सुरु ठेवायला काही हरकत नाही."

उद्योजकांच्या नाही तर सर्वसामान्यांच्या मतदावर लोकशाही टिकली
"काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना दिलेला पाठिंबा हा दक्षिण मुंबईपुरता विषय नाही, हा देशव्यापी विषय आहे. मोदींची सत्ता जात असल्याचा मुकेश अंबानींनी देशाला दिलेला संदेश आहे," असा घणाघातही राज ठाकरेंनी कालच्या सभेत केला. तसंच मुकेश अंबानी हे उद्धव ठाकरेंचे जीवलग मित्र असल्याचंही राज ठाकरे यांनी सांगितलं. याबद्दल विनोद तावडे म्हणाले की, "उद्योजकांच्या मतावर नाही तर सर्वसामान्यांच्या मतावर देशाची लोकशाही टिकून आहे, हे राज ठाकरेंना माहित नाही. कारण ते शरद पवारांचं बोट धरुन चालतात."

तसंच शरद पवार आणि नरेंद्र मोदी रचनात्मक कामांसाठी एकत्र आहेत. त्यांचं गुरुशिष्याचं नातं हे त्या अर्थाने आहे. मात्र, मोदी आणि पवारांचे राजकीय मतभेदही सगळ्यांच्या समोर असल्याचं विनोद तावडे म्हणाले.

शरद पवार, चंद्राबाबू नायडू यांनी रशियावरुन ईव्हीएम हॅक झाल्याचा आरोप केला होता. नशिब अंतराळातून ईव्हीएम हॅक होत असल्याचं म्हणाले नाहीत, असा टोलाही तावडेंनी लगावला. आपण जिंकू शकत नाही हे विरोधकांच्या लक्षात आल्याने त्यांनी कारणं तयार करायला आतापासूनच सुरुवात केल्याचं विनोद तावडे म्हणाले.

VIDEO | मनसैनिकांच्या टी शर्टवर 'ए लाव रे तो व्हिडीओ'