अहमदनगर : पुत्र सुजय विखे यांनी घेतलेला भाजपप्रवेशाचा निर्णय योग्य असल्याचं मत वडील आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केलं. आम्हा दोघांनाही सुजय यांच्या निर्णयाचा आनंद असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.


सुजय यांनी भाजपप्रवेशाचा जो निर्णय घेतला तो योग्य आहे. मला त्याचा आनंद आहे. मी जरी उपस्थित राहू शकलो नसलो, तरी आनंदी आहे, अशी प्रतिक्रिया विखे-पाटलांनी दिली. यापूर्वी सुजय यांनी माझी राजकीय धुरा सांभाळली होती. त्यामुळे त्यांची जी वाटचाल सुरु आहे, त्याबाबत त्यांनी नक्कीच विचार केलेला आहे, असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

रावेरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला दिली. विजयाची खात्री नसल्यामुळे राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसच्या गळ्यात मारल्याची चर्चा होती. काँग्रेसने माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी दिली आहे. याबाबत प्रदेशाध्यक्षांनी भूमिका मांडली पाहिजे, असं म्हणत विखेंनी हात वर केले.

VIDEO | सुजय विखेंचा भाजपप्रवेशाचा निर्णय योग्यच, वडील राधाकृष्ण विखे पाटलांचं मत

अहमदनगरची निवडणूक ही राष्ट्रवादीने व्यक्तिगत पातळीवर नेली. निवडणुकीत लोकशाही मार्गाने जो निकाल लागायचा तो लागेल, असंही विखे म्हणाले. नगर जिल्ह्यातल्या दोन्ही जागा म्हणजेच शिर्डी आणि अहमदनगर काँग्रेसकडे यावी अशी माझी भूमिका होती. नगरमध्ये राष्ट्रवादी तीन वेळा पडल्यामुळे मी जागा मागितली होती, मुलासाठी नाही, असं स्पष्टीकरणही विखे पाटलांनी दिलं.

राधाकृष्ण विखे पाटलांच्या भाजप प्रवेशाबाबत बऱ्याच दिवसापासून चर्चा आहे. 'त्याबाबत मी माझी भूमिका मांडलेली आहे. आता त्याची उत्तरे काळच देईल' असं सूचक वक्तव्य विखे पाटलांनी केलं.