पेण विधानसभा मतदार संघावर 1990 पासून ते 2004 पर्यंत शेतकरी कामगार पक्षाने वर्चस्व ठेवलं होतं. 2004 साली शेकापचा पराभव करुन इथे काँग्रेसने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. यांनतर 2009 ते 2019 पर्यंत शेकापने पुन्हा आपलं वचर्स्व कायम ठेवलं आहे. परंतु यावेळी या मतदारसंघात भाजप, शिवसेना (युती झाली तर) विरुद्ध शेकाप-राष्ट्रवादी आघाडी अशी तुल्यबळ लढत होऊ शकते.


पेण विधानसभा मतदारसंघात रोहा, पाली आणि सुधागड या तीन तालुक्यांचा समावेश होतो. एकंदरीत राज्यात गाजलेल्या पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरणानंतर इथली राजकीय समीकरणंही बदलत गेली.

पेण विधानसभा मतदार संघात 2014 च्या निवडणुकीत शेकापचे धैर्यशील पाटील विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसचे माजी आमदार रवी पाटील, शिवसेनेचे किशोर जैन यांच्यासोबत लढत दिली होती. या तिरंगीलढतीमध्ये शेकापच्या धैर्यशील पाटील यांना 64 हजार 616 मतं मिळाली होती, तर काँग्रेसचे माजी मंत्री रवी पाटील यांना 60 हजार 494 मतं मिळाली होती, ते दुसऱ्या स्थानी होते तर शिवसेनेच्या किशोर जैन यांना 44 हजार 257 मतं मिळाली होती.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत रायगडमधून शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांच्यात थेट लढत होती. भाजपचे वारे वाहत असतानाही रायगडमधून राष्ट्रवादीला पसंती देत सुनील तटकरेंना विजयी केलं. त्यांना 15 लाख मतदारांपैकी 7 लाख 80 हजार 290 लोकांनी कौल देऊन विजयी केलं तर अनंत गीतेंना 7 लाख 52 हजार 400 मतं मिळाली.

यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे महायुतीच्या उमेदवाराला लोकसभेला पेण मधून 89 हजार तर आघाडीच्या उमेदवाराला 88 हजार मतं मिळाली होती. त्यामुळे दोघांमध्ये केवळ एक हजार मतांचाच फरक पाहायला मिळाला होता.

जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शेकापने स्वतःचं वर्चस्व सिद्ध केलं आहे. या विधानसभा मतदारसंघातील 10 पैकी सहा जिल्हापरिषदांवर शेकापने झेंडा फडकवला आहे. त्याचबरोबर पेण नगरपरिषद निवडणुकीत पाटील गटाचे 11 नगरसेवक तर पेण शहर विकास आघाडीचे 10 नगरसेवक निवडून आले आहेत.

यासोबतच बदलत्या राजकीय प्रवाहात काँग्रेसचे माजी मंत्री राहिलेले रवी पाटील यांनी मेगाभरतीची संधी साधत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेऊन विश्लेषकांना एक आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांच्यासोबतच काँग्रेसच्या तंबूतील बरेच शिलेदार भाजपमध्ये दाखल झाले होते. याचा फरक लोकसभा निवडणुकीतही दिसून आला होता. त्यामुळे आता काँग्रेसला या भागात नेतृत्व राहिलं नसल्यानं काँग्रेससमोर उमेदवार शोधण्यापासून सर्व गोष्टींची तयारी करावी लागणार आहे. तर विद्यमान आमदार धैर्यशील पाटील यांच्यासमोर यामुळे एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

रायगड जिल्ह्याच्या दृष्टीने विचार केल्यास राजकीय ताकदीत शेकाप आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी जिल्ह्यावर पकड ठेवलेली आहे. मात्र पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे जिल्ह्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनीदेखील चांगली राजकीय मशागत करुन पक्षाला उभारी दिली आहे. विशेष करुन पेण, अलिबाग, कर्जत, श्रीवर्धन आणि कर्जत या शेकाप, राष्ट्रवादी आघाडीच्या ताब्यात असलेल्या मतदार संघावर विशेष लक्ष केंद्रीत करुन भाजपला नवी दिशा दिली आहे.

या मतदारसंघात आगरी, मराठा आणि आदिवासी मतदार बहुसंख्येने आहेत. त्यामुळे यावेळी भाजपकडून या निवडणुकीत मराठा आरक्षण कार्ड खेळलं जाण्याची शक्यता आहे. तर पेण विधानसभा मतदारसंघात युवा मतदारांची संख्यासुद्धा मोठी आहे. युवा मतदार प्रामुख्याने भाजप, शिवसेना पक्षाच्या सध्याच्या राजकीय वलयाकडे आकर्षित होतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोकप्रियतेकडे युवा वर्ग आकर्षित होत आहे. मात्र युतीच्या चर्चेत हा मतदारसंघ कोणाकडे जाणार यावर धैर्यशील पाटील यांच्यासमोरचं आव्हान ठरणार आहे.

तर वाशी, वडखळ, खारेपाटात मंजूर झालेली पाणी पुरवठा योजना ही यावेळी राजकीय प्रचाराचा मुद्दा ठरु शकते. तर शेकापसाठी जमेची बाजू म्हणजे पेण तालुक्यात जिते, वडखळ, काराव आणि पाबळ जिल्हापरिषदेवर शेकापचे पाचही सदस्य आहेत. तर सुधागडमध्ये पाली जिल्हापरिषद मतदारसंघ शेकापच्या ताब्यात आहे. शेकापचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडे आंबेवाडी आणि भातसई जिल्हापरिषद आहे. तर शिवसेनेकडे नागोठणे, जांभुळपाडा अशा दोन जिल्हापरिषदा आहेत. त्यामुळे दहापैकी आठ जिल्हापरिषद मतदारसंघात शेकाप, राष्ट्रवादी आघाडीची राजकीय ताकद आहे.

मतदार संघातल्या समस्या पाहिल्या तर पेण तालुक्यातल्या हेटवणे धरणावर पाणी योजना प्रभावीपणे राबवणे, त्याची बळकटी करणे अत्यंत गरजेचं आहे. पेण शहर आणि ग्रामीण भागात गणेश मुर्तीकला हा व्यवसाय झपाट्याने वाढतो आहे. लघुउद्योग, कुटीरोद्योग, रस्ते, वीज, पाणी आणि मुलभूत सुविधांपासून कोसो दूर आहे.

पेण, पाली, सुधागड, रोहा हा मतदार संघ मुख्यत्वे शेती आणि शेतीपूरक व्यवसायाचा कणा आहे. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यादृष्टीनं योजना प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे.

इच्छूक उमेदवार
शेकाप - धैर्यशील पाटील
भाजप - रवी पाटील
शिवसेना - किशोर जैन