मुंबई : महाराष्ट्रात चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात सोमवारी 29 तारखेला सतरा जागांवर मतदान होणार आहे, त्यात ठाणे, पालघर, कल्याण, भिवंडी, नाशिक, दिंडोरी, मावळ, शिरुर, नंदुरबार, धुळे, शिर्डी आणि मुंबईतल्या 6 जागांचा समावेश आहे


या सतरा जागांवर २०१४ साली काय झालं होतं?

 

२०१४ साली या सर्व सतरा जागा महायुतीने जिंकल्या होत्या.

ठाणे

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठाणे या मतदारसंघात ५०.८७ टक्के मतदान झालं होतं. २० लाख ७३ हजार २५१ मतदारांपैकी १० लाख ५४ हजार ५७५ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. शिवसेनेचे राजन विचारे यांना ५ लाख ९५ हजार ३६४ मतं पडली होती तर राष्ट्रवादीच्या संजीव नाईक यांना ३ लाख १४ हजार ६५ मतं पडली होती. राजन विचारे २ लाख ८१ हजार २९९ मतांनी विजयी झाले होते.

पालघर

या मतदारसंघात ६२.९१ टक्के मतदान झालं होतं. १५ लाख ७८ हजार १४९ मतदारांपैकी ९ लाख ९२ हजार ७७० मतदारांनी मतदान केलं. भाजपचे चिंतामण वनगा यांना ५ लाख ३३ हजार २०१ मतं पडली होती तर बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना २ लाख ९३ हजार ६८१ मतं पडली होती. वनगा २ लाख ३९ हजार ५२० मतांनी विजयी झाले होते. वनगा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना भाजप एकमेकाविरोधात कडवटपणे लढले होते. ती जागा राखण्यात भाजपला यश आलं होतं.



कल्याण 

या मतदारसंघात १९ लाख २२ हजार ३४ मतदारांपैकी फक्त ४२.९४ टक्के म्हणजे ८ लाख २५ हजार ४१४ मतदारांनी मतदान केलं होतं. शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे अडीच लाख मतांनी विजयी झाले होते. त्यांना ४ लाख ४० हजार ८९२ मतं पडली होती तर शिवसेना सोडून राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या आनंद परांजपेंना १ लाख ९० हजार १४३ मतं पडली होती. मनसेच्या राजू पाटील यांनी सुद्धा जवळपास सव्वा लाख मतं मिळवली होती.

भिवंडी 

या मतदारसंघात५१.३३ टक्के म्हणजेच १६ लाख ९६ हजार ५८४ पैकी ८ लाख ७५ हजार ८१४ मतदारांनी मतदान केलं होतं. भाजपच्या कपिल पाटील यांना ४ लाख ११ हजार ७० मतं तर काँग्रेसच्या विश्वनाथ पाटील यांना ३ लाख १ हजार ६२० मतं पडली होती. कपिल पाटील १ लाख ९ हजार ४५० मतांनी विजयी झाले होते.

नाशिक

मतदारसंघात ५८.८३ टक्के मतदान झालं होतं. १५ लाख ९३ हजार ७७४ मतदारांपैकी ९ लाख ३७ हजार ६०० मतदारांनी मतदान केलं. मनसेतून शिवसेनेत आलेले हेमंत गोडसे यांनी राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांचा १ लाख ८७ हजार ३३६ मतांनी पराभव केला होता. गोडसेंना ४ लाख ९४ हजार ७३५ मतं पडली होती तर भुजबळांना ३ लाख ७ हजार ३९९ मतं पडली होती. यंदा गोडसे विरुद्ध राष्ट्रवादीने समीर भुजबळ यांना रिंगणात उतरवलं आहे. मात्र माणिकराव कोकाटेंनी बंडखोरी करत अर्ज दाखल केल्यामुळे युतीसमोरची वाट खडतर बनली आहे.

दिंडोरी 

या मतदारसंघात ६३.४१ टक्के मतदान झालं होतं. १५ लाख ३० हजार २०८ मतदारांपैकी ९ लाख ७० हजार ३१६ मतदारांनी मतदान केलं होतं. भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण २ लाख ४७ हजार ६१९ मतांनी विजयी झाले होते, त्यांना ५ लाख ४२ हजार ७८४ तर राष्ट्रवादी काँगेसच्या भारती पवार यांना २ लाख ९५ हजार १६५ मतं पडली होती. यंदा हरिश्चंद्र पवारांना डावलून भाजपने चक्क भारती पवार यांना तिकीट दिलं आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या धनराज महाले याचं आव्हान असणार आहे.

मावळ 

या मतदारसंघात ६०.११ टक्के मतदान झालं होतं. १९ लाख ५३ हजार ७४१ मतदारांपैकी ११ लाख ७४ हजार ३८० मतदारांनी मतदान केलं. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांना ५ लाख १२ हजार २२६ मतं पडली होती तर शेकापकडून लढणाऱ्या लक्ष्मण जगताप यांना ३ लाख ५४ हजार ८२९ मतं पडली होती. बारणे १ लाख ५७ हजार ३९७ मतांनी जिंकले होते. राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर तिसऱ्या स्थानावर ढकलल्या गेले होते. यंदा इथून राष्ट्रवादीने अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उतरवलं आहे. त्याआधी पवार कुटुंबात झालेल्या नाट्यामुळेही इथली लढतं एकदम चर्चेत आली आहे.

शिरुर

शिरुर मतदारसंघात ५९.७३ टक्के मतदान झालं होतं. १८ लाख २४ हजार ११२ मतदारांपैकी १० लाख ८९ हजार ५७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. शिवसेनेच्या शिवाजीराव आढळरावांनी   तब्बल ३ लाख १ हजार ८१४ मतांनी हा गड राखला होता, त्यांना ६ लाख ४३ हजार ४१५ मतं पडली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवदत्त निकम यांना ३ लाख ४१ हजार ६०१ मतं पडली होती. यंदा आढळरावांविरुद्ध राष्ट्रवादीने लोकप्रिय टीव्ही कलाकार अमोल कोल्हे यांना उतरवलं आहे. त्यामुळे इथे चुरस पाहायला मिळेल असं बोललं जातंय.

नंदुरबार 

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या आदिवासी बहुल मतदारसंघात ६६.७७ टक्के मतदान झालं होतं. १६ लाख ७२ हजार ९४३ मतदारांपैकी ११ लाख १७ हजार २४ मतदारांनी मतदान केलं.  भाजपच्या डॉ. हिना गावित यांनी नऊ वेळा खासदार राहिलेल्या काँग्रेसच्या माणिकराव गावित यांना हरवण्याची किमया केली होती. हिना गावित १ लाख ६ हजार ९०५ मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यांना ५ लाख ७९ हजार ४८६ मतं पडली होती तर माणिकरावांना ४ लाख ७२ हजार ५८१ मतं पडली होती. यंदा भाजपने पुन्हा हिना गावित यांना संधी दिली आहे तर काँग्रेसने माणिकराव किंवा त्यांच्या मुलाला डावलून आमदार के सी पाडवी यांना तिकीट दिलं आहे.

धुळे – 

धुळे या मतदारसंघात ५८.६८ टक्के मतदान झालं होतं. १६ लाख ७५ हजार ३६७ मतदारांपैकी ९ लाख ८३ हजार ११६ मतदारांनी मतदान केलं. भाजपच्या डॉ. सुभाष भामरे यांना ५ लाख २९ हजार ४५० मतं पडली होती तर काँग्रेसच्या अमरीश पटेल यांना ३ लाख ९८ हजार ७२७ मतं पडली होती. भामरे १ लाख ३० हजार ७२३ मतांनी विजयी झाले होते. त्यांना केंद्रात संरक्षणी राज्यमंत्री पद सुद्धा मिळालं होतं. यंदा भामरेंना गोटे गटाच्या विरोधाचा सामना सुद्धा करावा लागत आहे.

शिर्डी या राखीव मतदारसंघात६३.८० टक्के मतदान झालं होतं. १४ लाख ६२ हजार २६७ मतदारांपैकी ९ लाख ३२ हजार ८९३ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांनी काँग्रेसच्या भाऊसाहेब वाकचौरे यांचा १ लाख ९९ हजार ९२२ मतांनी पराभव केला होता. लोखंडेंना ५ लाख ३२ हजार ९३६ मतं पडली होती तर वाकचौरेंना ३ लाख ३३ हजार १४ मतं पडली होती. बसप आणि आपच्या उमेदवारांनीही १० हजारापेक्षा जास्त मतं मिळवली होती.

उत्तर मुंबई या मतदारसंघात५३.०७ टक्के मतदान झालं होतं. १७ लाख ८३ हजार ८७० मतदारांपैकी ९ लाख ४६ हजार ७१७ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. भाजपचे गोपाळ शेट्टी यांना ६ लाख ६४ हजार ४ मतं पडली होती तर काँग्रेसच्या संजय निरुपम यांना २ लाख १७ हजार ४२२ मतं पडली होती. गोपाळ शेट्टी सर्वाधिक मताधिक्याने म्हणजे तब्बल ४ लाख ४६ हजार ५८२ मतांनी विजयी झाले होते. यंदा काँग्रेसने त्यांच्याविरुद्ध सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उतरवलं आहे. याआधीही काँग्रेसने इथुन सिनेस्टार गोविंदाला तिकीट दिलं होतं त्यांनी अनुभवी राम नाईक यांचा पराभव केला होता. उर्मिलाच्या एन्ट्रीमुळे आणि त्यांना मनसेची साथ मिळाली तर ही लढत रंगतदार ठरु शकते.

वायव्य मुंबई 

या मतदारसंघात५०.५७ टक्के मतदान झालं होतं. १७ लाख ७५ हजार ४१६ मतदारांपैकी ८ लाख ९७ हजार ८७१ मतदारांनी मतदान केलं होतं. शिवसेनेच्या गजानन किर्तीकर यांना ४ लाख ६४ हजार ८२० मतं पडली होती तर काँग्रेसच्या गुरुदास कामत यांना २ लाख ८१ हजार ७९२ मतं पडली होती. किर्तीकर १ लाख ८३ हजार २८ मतांनी विजयी झाले होते. यंदा त्यांच्यासमोर संजय निरुपम यांचं आव्हान असणार आहे.

ईशान्य मुंबई 

या मतदारसंघात ५१.७० टक्के मतदान झालं होतं.
१६ लाख ६८ हजार ३५७ मतदारांपैकी ८ लाख ६२ हजार ५२२ मतदारांनी मतदान केलं होतं.
भाजपच्या किरीट सोमय्या यांना  ५ लाख २५ हजार २८५ मतं पडली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय दिना पाटील यांना २ लाख ८ हजार १६३ मतं पडली. आम आदमी पक्षाकडून लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना ७६ हजार ४६१ मतं पडली होती.
किरीट सोमय्या जवळपास ३ लाख १७ हजार मतांनी विजयी झाले होते.
रेल्वे कामांसाठी, विरोधकांवर आर्थिक गुन्ह्यांचे आरोप करण्यासाठी आणि शिवसेनेला अंगावर घेण्यासाठी सोमय्या चर्चेत राहिले मात्र यंदा त्यांचं तिकीट कापलं गेलं. त्यांच्या ऐवजी मनोज कोटक यांच्या पारड्यात भाजपनं आपलं वजन टाकलं आहे.

उत्तर मध्य मुंबई

प्रमोद महाजन आणि सुनील दत्त या दोन दिग्गजांच्या मुलींमध्ये इथली लढाई लढली गेली. या मतदारसंघात ४८.६७ टक्के मतदान झालं होतं. १७ लाख ३७ हजार ८४ मतदारांपैकी ८ लाख ४५ हजार ४५५ मतदारांनी मतदान केलं होतं.
भाजपच्या पुनम महाजन यांना ४ लाख ७८ हजार ५३५ मतं पडली होती तर काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना २ लाख ९१ हजार ७६४ मतं पडली होती. पुनम महाजन  १ लाख ८६ हजार ७७१ मतांनी विजयी झाल्या होत्या.  यंदा पुन्हा या दोघी आमनेसामने असतील

दक्षिण मध्य मुंबई

मतदारसंघात ५३.०९ टक्के मतदान झालं होतं. १४ लाख ४७ हजार ८८६ मतदारांपैकी ७ लाख ६८ हजार ७५० मतदारांनी मतदान केलं होतं. शिवसेनेचे राहुल शेवाळे  यांना ३ लाख ८१ हजार २७५ मतं पडली होती तर काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांना २ लाख ४२ हजार ९३३ मतं पडली होती.
मनसेच्या आदित्य शिरोडकरांना ७३ हजारांवर मतं पडली होती. राहुल शेवाळे १ लाख ३८ हजार ३४२ मतांनी विजयी झाले होते.

दक्षिण मुंबई
मुंबईतल्या बहुचर्चित मतदारसंघापैकी एक या मतदारसंघात ५२.४९ टक्के मतदान झालं होतं. १४ लाख ८५ हजार ८४४ मतदारांपैकी ७ लाख ७९ हजार ८५९ मतदारांनी मतदान केलं होतं. शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी काँग्रेसच्या हाय प्रोफाईल मिलिंद देवरा यांचा १ लाख २८ हजारांवर मतांनी पराभव केला होता.

अरविंद सावंत यांना ३ लाख ७४ हजार ७८० मतं पडली होती. तर देवरा यांना २ लाख ४६ हजार ७३२ मतं मिळाली होती. मनसेच्या बाळा नांदगावकर यांनीही जवळपास ८५ हजार मतं घेतली होती.
यंदा सावंत आणि देवरा पुन्हा आमनेसामने आहेत. मुकेश अंबानींच्या पाठिंब्याचा व्हिडिओ दाखवत मिलिंद देवरा यांनी प्रचारात आघाडी घेतली होती.