उस्मानाबाद : सरळ साध्या भाषेत उस्मानाबाद जिल्ह्याचं राजकारण समजून घ्यायचं म्हणजे डॉ. पद्मसिंह पाटील ह्या एका नावाभोवाताली फिरणारं वर्तुळ असं त्याचं वर्णन करता येईल. जिल्ह्याच्या राजकारणाचा राष्ट्रवादीचे नेते डॉ. पद्मसिंह पाटील 'यूएसपी' त्यामुळे त्यांचा समर्थक किंवा विरोधक हे दोन सरळ गट पहायला मिळतात. राष्ट्रवादी-काँग्रेस असं आघाडी सरकार सत्तेत असताना देखील पाटील यांना असलेल्या विरोधामुळे काँग्रेसची अनेक नेतेमंडळी  शिवसेनेला मदत करायची आणि त्यामुळे लोकसभेसारख्या निवडणुकीत  शिवसेनेचा उमेदवार सहज शिवधनुष्य पेलायचा. कधी काळी पाटलांचे समर्थक असलेले कै. पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील यांच्यात सत्तासंघर्ष झाला त्यानंतर दोन सत्ताकेंद्र उदयाला आली. शिवसेनेचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर आणि माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते राणाजगजितसिंह पाटील या सत्ता केंद्राचे वासरदार.  त्यामुळे सद्यस्थितीला ओमराजे समर्थक आणि राणा पाटील समर्थक असं चित्र उस्मानाबादमध्ये पहायला मिळतं. आतापर्यंत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत दोघांमध्ये झालेल्या सरळ लढतीत दोन वेळेस ओमराजे निंबाळकर यांनी तर एक वेळेस राणाजगजितसिंह पाटील यांनी गुलाल उधळला. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा बॅंक किंवा सध्या धुराडी बंद असलेला तेरणा सहकारी साखर कारखाण्याची निवडणूक असो दोघांमध्ये काटों की टक्कर पहायला मिळते. तेरणा बंद झाला तसं शिवसेनेत राजकीय केंद्र ही विस्थापित झालं. सद्यस्थितीला मातोश्रीवर शिवजलक्रांती करणारे तानाजी सावंत यांच्या शब्दाचं वजन वाढलंय. असं असलं तरी राजकारणाचा यूएसपी बदलेला नाही. पाटील घराण्याला विरोधी गटाचं नेतृत्व सावंतांकडे आलं आहे एवढचं.


राणाजगजितसिंह पाटलांच्या पक्ष बदलाची चर्चा आणि संभ्रमावस्थेत कार्यकर्ते
राणाजगजितसिंह पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?  या चर्चेनं राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गोटात कलमालीची संभ्रमावस्था आहे. गेली पाच वर्ष भाजपच्या धोरणावर सडकून टीका केलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोर  भाजपसोबत काम कसं करावं हा प्रश्न आहे. तर पद्मसिंह पाटील आणि त्यांच्या घराण्याला विरोध हाच राजकीय विचार असलेले शिवसेना- भाजपाचे कार्यकर्ते राणाजगजितसिंह पाटील यांच्या मांडीला मांडी लावून काम कसं करावं या विचाराणे ग्रासले आहेत. राणा पाटील यांनी घड्याळ सोडून कमळ हाती घेतलं तर ते उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघातून नाही तर तुळजापूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे. मात्र असं झालं तर शरद पवार यांना उस्मानाबादमध्ये तुल्यबळ उमेदवार शोधणं देखील कठीण असेल. जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीमध्ये पाटील कुटुंबाचा एकछत्री अमंल पहायला मिळतो. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचा नंबर दोन नेता कोण? या प्रश्नाला उत्तर नाही. त्यामुळे राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपात प्रवेश केला तर राष्ट्रवादीचा उमेदवार कोण हे सांगणं देखील अवघड आहे. सध्याचं वातावरण पाहता राणा पाटील यांच्या भाजप प्रवेशाची फक्त औपचारिकता शिल्लक असल्याचं बोललं जात आहे. मात्र शरद पवारांनी ज्या सहा आमदारांचे साठ आमदार केले त्या सहामध्ये पद्मसिंह पाटील यांचा समावेश होता. त्यामुळे राणाजगजितसिंह पाटील पवारांसोबत निष्ठावंत राहतील असं मानणारा जिल्ह्यात मोठा वर्ग आहे. पाटील यांचा भाजप प्रवेश टळला तर तेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील हे मात्र निश्चित आहे. गेली पाच वर्ष मतदारसंघात त्यांच्या कुटुंबाचा असलेला वावर त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरेल. तसेच कट्टर राजकीय विरोधक असलेले ओमराजे लोकसभेत निवडून गेल्यानं राणाजगजितसिंह यांच्यासमोर विधानसभा निवडणुकीत सर्वमान्य उमेदवार निवडताना शिवसेनेची थोडी कसोटी लागणार आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला आणि कडवट शिवसैनिक!
उस्मानाबाद जिल्ह्यातील पूर्वीचा कळंब-वाशी हा विधानसभा मतदारसंघ म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला  समजला जायचा. भूम-परांड्यामध्ये राहुल मोटे यांच्या रुपात डॉ पद्मसिंह पाटील यांना हक्काचा शिलेदार मिळाला होता. त्यामुळे तिथे नेतृत्व उद्याला आलं. मात्र कळंब आणि वाशीमध्ये राष्ट्रवादीचा नेता कोण? या प्रश्नाला अनेक पर्याय होते. नेतृत्व सक्षम नसल्याने शिवसेनेचं संघटन अधिक सक्षमपणे वाढत गेलं. मात्र मतदारसंघ पुर्नरचनेत भूम-परंडा- वाशी आणि कळंब- उस्मानाबाद असे दोन विधानसभा मतदारसंघ आस्तित्वात आले. त्यामुळे  शिवसेनेचा बालेकिल्ला विभागला गेला.  त्याचवेळी  काँग्रेसमधून ओमराजे  शिवसेनेत दाखल झाले. त्यांच्यासोबत ओमराजे समर्थक ही शिवसेनेत दाखल झाले. स्वत:ला कडवट शिवसैनिक म्हणण्यापेक्षा ओमराजे समर्थक म्हणून स्वत:ची ओळख त्यांना जास्त आवडीची होती. राजकीय गरज म्हणून पक्षात नवख्या असलेल्या ओमराजेंना  शिवसेनेनं कळंब- उस्मानाबादमधून आखाड्यात उतवलं. कै. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणात पद्मसिंह पाटील याचं असलेलं नावं आणि लोकांची सहानभूती मिळाल्याने पहिल्यांदा शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीत ओमराजे यांचा दणदणीत विजय झाला. त्यानंतर जिल्हापरिषद, तेरणा सहकारी साखर कारखाना, जिल्हा बॅंका ओमराजेंनी ताब्यात घेतल्या. मात्र दुसऱ्या पंचवार्षिकला मतदारांनी भाकरी फिरवली राणा जगजितसिंह पाटील यांनी पराभवाची परतफेड केली.

निष्ठावंत शिवसैनिक ओमराजेंपासून दुरावल्याने हा पराभव झाला. असं त्याकडे पाहिलं गेलं. लोकसभा निवडणुकीपर्यंत ओमराजेंना  दुरावलेली मनं सांधता आली नाहीत. माजी खासदार प्रा. रवी गायकवाड यांनी वायरल क्लीप वरुन निवडणुकीच्या काळात थेट पोलिसात केलेली तक्रार हे त्याचंच उदाहरण. मातोश्रीवर तानाजी सावंत यांचं वाढतं वजन ही खदखद त्यामागे होती. ओमराजे लोकसभेवर निवडणूक गेल्याने आता विधानसभा उमेदवारीसाठी दावेदारांची संख्या वाढली आहे. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आणि उस्मानाबाद शहर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत थेट जनतेतून निवडून आलेले मकरंदराजे निंबाळकर यांचं नाव आघाडीवर आहे. तर शिवसेनेत ज्यांची राजकीय कारकीर्द घडली, वाढली असे शिवसेनेचे नेते अजित पिंगळे, अनिल खोचरे यांचा देखील उमेदवारीवर दावा आहे. तसेच तानाजी सावंत समर्थक आणि नुकतेच काँग्रेसमधून शिवसेनेते दाखल झालेले शिवाजी कापसे यांच्या नावाची देखील चर्चा आहे. त्यामुळे बालेकिल्ल्यात शिवसेना निष्ठावंताला न्याय देते की आयात नेत्याच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते ? हे पाहावं लागणार आहे.

भाजपची भूमिका आणि उमेदवारीसाठी आग्रह
युतीच्या जागावाटपात कळंब-उस्मानाबाद हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीसाठी सोडून घ्यावा असा आग्रह भाजप नेत्यांकडून वरिष्ठांकडे केला जात आहे. त्यामध्ये यश आलं तर भाजपकडून प्रदेश कार्यकारणी सदस्य असलेल्या नितीन काळे यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. मात्र शिवसेना आपल्या हक्काचा मतदारसंघ सोडेल याची धुरकटशीही शक्यता नाही. जिल्ह्याच्या राजकारणात भाजपची भूमिकाही राष्ट्रवादीला पूरक अशीच राहिली आहे. जिल्हापरिषदेत शिवसेनेतील नाराजाच्या मदतीने भाजप- राष्ट्रवादीची सत्ता आहे. हेच चित्र जिल्हा बॅंकेत पहायला मिळतं. लोकसभा निवडणूक सोडली तर शिवसेनेपेक्षा भाजप राष्ट्रवादीच्या जवळ आहे.

वंचित फॅक्टर आणि प्रचारातील मुद्दे
लोकसभेला सोलापूर, औरंगाबाद, अकोला, सांगली या मतदारसंघात वंचितची जोरदार चर्चा झाली. मोठा जनाधारही मिळाला. वंचितच्या उमेदवाराला उस्मानाबादमध्येही लाखाच्या जवळपास मतं मिळाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचितची ताकत दुर्लक्षित करुन चालणार नाही. निवडणुकीत वंचित फॅक्टर निर्णायक ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा गजर वाजेल असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत होते.  मात्र पाकिस्तानवरच्या सर्जीकल स्ट्राईकने अवघड वाटणारा ओमराजे यांचा विजय सहज सोप्पा झाला. मात्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी- काँग्रेसकडून दुष्काळ, रोजगार, आरक्षण, कर्जमाफी हे मुद्दे प्रचारात असतील अशी अपेक्षा आहे. तर आतापर्यंत जिल्ह्याच्या भकासपणाला पाटील कुटुंब जबाबदार असल्याची टीका विरोधकांकडून कायम करण्यात आली. आता राणा पाटील भाजपमध्ये दाखल झाल्यावर भाजपच्या प्रचाराचा सूर काय असणार हे पाहावं लागणार आहे.

जाणून घ्या या मतदारसंघाविषयी