मुंबई : बोरिवलीमधील रिक्षावाले, फेरीवाले, मोची, किरकोळ व्यावसायिक, सामान्य नागरिक यांनी आपापल्या कुवतीनुसार 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये देऊन जमा केलेला निधी म्हणजे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला मदतीचा हात आहे. मग ती रक्कम खासदार संभाजी राजे यांना भीक का वाटावी, असा प्रश्न मला पडला आहे. या आपत्तीच्या वेळी कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील आपल्या बंधू भगिनींना मदत करण्याची सर्वसाधारण माणसाला इच्छा होती आणि त्यासाठी मंत्री असूनही मतदारसंघात फिरून यासर्वांचं प्रेम, त्यांनी देऊ केलेली मदत एकत्र करून पूरग्रस्तांसाठी पाठविली, तर याला भीक का म्हणावे, हा प्रश्न ही मदत देणार्‍या प्रत्येक माणसाला पडला आहे आणि म्हणूनच पूरग्रस्तांसाठी मदत पाठविलेल्या जनतेच्या भावनांचा अनादर होत आहे, असे मला नम्रपणे नमूद करावेसे वाटते, असे विनोद तावडे यांनी म्हटले आहे.

स्वाभिमानी कोल्हापूरकरांना भीकेची गरज नाही, संभाजीराजेंचा विनोद तावडेंवर निशाणा


गोर-गरीब रिक्षावाले, फेरीवाले, छोटे-छोटे दुकानदार, हातावर पोट असणार्‍या माझ्या गरीब जनतेकडून जमा झालेले 10-10 रुपये मिळून 3.50 लाख रुपये आणि इतर मोठ्या देणगीदारांकडून एकत्र झालेले 24.50 लाख रुपये, अशी एकूण 28 लाखांची रक्कम फक्त बोरिवलीकरांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आली. हा आमचा खारीचा वाटा आहे, हे आम्हा सर्वांना माहीत आहे, असे तावडेंनी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या या मदतफेरीचे राजकीय द्वेषापोटी विडंबन केले, हे राजकारण म्हणून मी समजू शकतो. कारण, त्यांच्याकडे आता बाकी कोणतेही मुद्दे राहिले नाहीत आणि एका विधानसभेतून पहिल्यांदाच इतका मोठ्या प्रमाणात मदतनिधी जमा होतो, हे त्यांना पहावले नसेल. पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या राजकीय प्रचाराला संभाजी राजे यांनी बळी पडावे, याचे मला दुःख आहे, असे तावडे म्हणाले.

आमच्यासारख्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी अडचणीत असलेल्या जनतेला आधार दिला, गोरगरिबांचे प्रेम जमा करून पूरग्रस्तांसाठी पाठविले, याचे संभाजी राजे यांनी खरेतर कौतुक करायला हवे होते. पण त्याची राजे यांनी अवहेलना केली, याची मला खंत वाटते, असे तावडेंनी म्हटलं आहे.



कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीवरुन खासदार संभाजीराजे यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे निशाणा साधला होता. विनोद तावडे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील रस्त्यावर उतरुन पूरग्रस्तांसाठी मदत मागितली होती. यावर संभाजीराजे चांगलेच संतापले आहे. स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भीकेची गरज नाही, अशा शब्दात संभाजीराजेंनी विनोद तावडे यांना सुनावलं होतं. त्यांनी फेसबुकवर आपला रोष व्यक्त केला आहे. स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी? ह्यापेक्षा दुर्दैव ते काय? मी हा व्हिडीओ आत्ताच पाहिला, इथे भीक स्वीकारली जाणार नाही. पूरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही. सर्वसामान्य महाराष्ट्रवासीयांचे प्रेम, कोल्हापूर, सांगलीकरांनी मनापासून स्वीकारलं आहे, असं राजेंनी म्हटलं होतं.