पिंपरी चिंचवड : मावळ लोकसभेसाठीच्या युतीच्या आढावा बैठकीत गोंधळ पाहायला मिळाला. आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे यांच्यातील वादाचा थेट फायदा राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना मिळण्याची शक्यता आहे.


मावळ लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी भाजप-शिवसेना भाजपची संयुक्त बैठक आयोजित केली होती. बैठकीच्या आधी दिवंगत आणि गोवा मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना भाजप शहर कार्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली. तिथे लक्ष्मण जगताप उपस्थित होते. मात्र तिथून बैठकीला येण्याऐवजी त्यांनी मोबाईल स्विच ऑफ ठेवून बैठकीला पाठ फिरवली आहे.


पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे, श्रीरंग बारणे यांच्यासह पिंपरी, चिंचवड आणि मावळ या तीन विधानसभेतील खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मात्र लक्ष्मण जगताप यांनी बैठकीला पाठ फिरवल्याने श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचं स्पष्ट झालं आहे.


गेल्या दहा वर्षांपासून बारणे-जगताप यांच्यात शीतयुद्ध सुरु आहे. हा वाद मिटवण्यासाठीच भाजप-शिवसेनेकडून संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र लक्ष्मण जगतापांनी श्रीरंग बारणेसोबतच वैर उघडपणे दाखवून दिलं. श्रीरंग बारणे यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली तर याचा फटका बसण्याची शक्यता आहे. याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवारला होईल हे उघड आहे.


या सगळ्या घडामोडी होत असताना एका कार्यकर्त्याने अचानक काही पत्रके वाटण्याचा प्रयत्न केला. ती पत्रके उपस्थित कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतली. त्यातील एक पत्रक एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. या पत्रकातील मजकुरावरुन बारणे यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचं उघड झालं आहे.


फाडलेल्या पत्रकात काय लिहिलं आहे?


श्रीरंगाचे हात दाखवून अवलक्षण... 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदार संघातील भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार बारणे यांचा मागच्या वेळेस बेडकाचा बैल दाखवून भोकाडी दाखवण्याचा कार्यक्रम चांगलाच यशस्वी झाला खरा... पण त्यानंतर 5 वर्षे या गड्याने संसदरत्न नावाखाली झोपूनच काढली. प्रत्यक्ष मतदार संघातील यक्ष प्रश्नाबाबत कुठलेच ठोस निर्णय महाशयांना घेता आले नाही. कायम स्वार्थाचे राजकारण करणाऱ्या बारणेंनी ज्या कलाटेनी त्यांच्या उमेदवारी आणि विजयासाठी जीवाचे रान केले, त्याचाच पहिला तळीभंडार करण्याचा प्रयत्न केला. विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत चक्क त्यांच्याविरोधात उघड प्रचार केला. मनपाच्या निवडणुकीत स्वतः त्यांच्या वॉर्डात राष्ट्रवादीशी भ्रष्ट युती केली. त्यामुळे स्वतःच्या गावातला पॅनल ही ते निवडून आणू शकले नाहीत. पडे तो भी टांग उपर या म्हणी प्रमाणे होवू घातलेल्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या नटरंगाणे उद्धव ठाकरेंचा कोणताही अधिकृत निरोप नसताना, पक्षाच्या सर्व्हेत पूर्ण निगेटिव्ह रिपोर्ट असताना.... त्याची कारणे ही तशीच आहेत. कारण खासदार झाल्यावर शिवसैनिकांची कमी आणि राष्ट्रवादीची धुणीभांडी धुण्यात या महाशयांनी पाच वर्षे घालवली. असं असताना कायम शिवबंधन असलेला सच्चा शिवसैनिक असल्याचा कायम खोटा आव आणला. याच बोगस वागण्यातून काल सोनई मंगल कार्यलयात स्वतःला अधिकृत स्वयंघोषित खासदारकीचा उमेदवार म्हणणाऱ्या बारणेच्या सभेला फक्त 250 कार्यकर्ते उपस्थित होते. पाच वर्षे स्वपक्षीयांकडे दुर्लक्ष आणि आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीसोबत चाललेली मॅचफिक्सिंग मात्र जनतेच्या लक्षात आली आहे. कारण लोकसभेत पराभूत होऊन विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर चिंचवड विधानसभा लढण्याचा शब्द राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्टींकडून घेऊन बसला आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना माझी पोट तिडकीने विनंती आहे की वाघाचे कातडे घालून कुणी वाघ होत नाही. मोदी साहेबांना पंतप्रधानपदी पुन्हा एकदा विराजमान होण्यासाठी एक एक सीट महत्वाची असताना अशा खंडोजी खोपडेंना तिकीट जाऊन युतीचे कधीही न भरून येणारे नुकसान होणार आहे. युतीचा खंदा समर्थक आणि मोदी साहेबांचा चाहता म्हणून हाताच्या कंकणाला आरसा कशाला? म्हणून हा सर्व मागोवा तुमच्या समोर ठेवत आहे.
जय हिंद जय महाराष्ट्र.