बारामती : माढ्याची जागा सुरुवातीपासून आमच्याकडे आहे. ही जागा आणण्यासाठी अधिक काळजी घ्यावी म्हणून मी केवळ तिथून निवडणूक लढवणार असे सिग्नल देत होतो. मात्र मी तिथून लढणार नव्हतो. तसा माझा विचार नव्हता. आम्हाला विजयसिंह मोहितेंना तिथून लढवायचं होतं. मात्र त्या मतदारसंघात बाकीच्या 5 विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या नावाला विरोध होता. मात्र इथला उमेदवार हा त्यांच्या सहकार्याने दिला असता, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
VIDEO | प्रत्येक प्रश्नाला नेमकी उत्तरे, शरद पवारांची 'पवार'फुल' मुलाखत | भाग 1 | विचारसंहिता | एबीपी माझा


'विचारसंहिता' या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमांतर्गत एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आणि लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी शरद पवार यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर दिलखुलास उत्तरे दिली.



अहमदनगरच्या जागेच्या वादावरून बोलताना ते म्हणाले की, अहमदनगरच्या जागेविषयी काँग्रेसचे जे राज्यातील अन्य घटक होते ते आम्हाला सांगायचे की इथे तुमची ताकत जास्त आहे. ही जागा नेहमी राष्ट्रवादीने जिंकलीय, असे पवार यांनी सांगितले. अहमदनगरचा संघर्ष माझ्यामुळे नाही झाला. त्यावेळी राजीव गांधींनी ही जागा जिंकायचीय असं मला सांगितलं होतं, म्हणून मी लढलो आणि त्यावेळी जिंकलो. यावेळीही मी त्यांचं नावही घेतलं नव्हतं, असे पवार यांनी विखे पाटलांचे नाव न घेता सांगितलं. अहमदनगरचं गणित स्पष्ट आहे. राष्ट्रवादीकडे मत जास्त होती. हे माझ्या सहकाऱ्यांचा सामूहिक मत होतं, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला, असे ते म्हणाले.


मोदींएवढी व्यक्तिगत टीका कुणी केली नाही, शरद पवारांचे मोदींवर टीकास्त्र


राजकारणात आतापर्यंत केवळ धोरणात्मक टीका व्हायची. मात्र नरेंद्र मोदींऐवढी व्यक्तिगत टीका दुसरा कोणताच नेता करत नाही, अशा शब्दात शरद पवारांनी पंतप्रधानांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. तिहारमधील कैद्यानं राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडवल्याचा गौप्यस्फोट काल मोदींनी गोंदियात आयोजित सभेत केला होता. तसंच पवार कुटुंबांमध्ये कलह सुरू असल्याचं विधान मोदींनी वर्ध्यामधल्या सभेत केलं होतं.

यावेळी पवार म्हणाले की, आज देशातील आणि राज्यातील राजकीय हवा बदलली आहे. आजच्या राज्यकर्त्यांच्या संदर्भात ग्रामीण भागातील नागरिकांच्या संतप्त भावना आहेत. अशी परिस्थिती आजवर कधी पाहिली नाही. देशाच्या पातळीवर बदल व्हावा अशी भावना लोकांची आहे, असे पवार म्हणाले.

आता मोदींच्या प्रचाराची दिशा धार्मिक
पाच वर्षापूर्वी गुजरात पॅटर्न हे विकासाचे मॉडेल आहे अशी भावना लोकांच्या मनात होती.  पाच वर्षांपूर्वी विकासाचे आश्वासन देत हे एनडीए सरकारमध्ये आले. विकास ही त्यांच्या प्रचाराची दिशा होती. मात्र आता मोदींच्या प्रचाराची दिशा धार्मिक आहे, अशी टीका पवारांनी केली. पाच वर्षात अपेक्षेची पूर्तता झाली नाही. मागील निवडणुकांत एकदाही हिंदू शब्द वापरला नाही, विकास हाच शब्द वापरला, आता मात्र हिंदू आणि दहशतवाद या शब्दाचा वापर करून निवडणुका लढवत आहेत, अशी घणाघाती टीका पवार यांनी केली.

सत्ताधाऱ्यांना हल्ल्यांचा राजकीय फायदा घ्यायचाय
मोदी हे 56 इंचाची छाती आहे, असे ज्या दिवसापासून सांगायला लागले तेव्हापासून यांचा उद्देश समोर येऊ लागला. दहशतवाद्यांवर आणि पाकिस्तानवर काँग्रेसच्या काळातही अनेक हल्ले केले, मात्र त्याचा गाजावाजा कधी केला नाही. या हल्ल्यांचे श्रेय हे सैन्याला दिलं पाहिजे. यात राजकारण आणू नये. मात्र यावेळी सरळ दिसत होतं की, यांना या हल्ल्यांचा राजकीय फायदा घ्यायचा आहे, असेही पवार म्हणाले.

विखुरलेल्या विरोधकांना एकत्रित आणण्याचे प्रयत्न करू
यावेळी ते म्हणाले की, देशात परिवर्तनाची गरज आहे. त्यासाठी आम्ही देशभरात मोदींच्या विरोधात एकत्र आलो. यासाठी मी पुढाकार घेतला. मी पुढाकार घेतल्याने मोदी नाराज झाले. माझा प्रामाणिक प्रयत्न असा होता की एनडीएविरोधी घटकांना एकत्र आणायचं. किमान संवाद व्हायला हवा, अशी माझी भूमिका होती. या लोकसभा निवडणुकीनंतरही विखुरलेल्या विरोधकांना एकत्रित आणण्याचे प्रयत्न करू, असेही पवार म्हणाले.