लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2004 सालचा इतिहास विसरु नये. 2004 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार सत्तेत येईल, असे अनेकांना वाटत होते. परंतु सर्वांची भाकितं काँग्रेसने खोटी ठरवली होती. त्यामुळे 2004 हे वर्ष मोदींनी कधीही विसरु नये, असा इशारा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी दिला आहे.


सोनिया गांधी या उत्तर प्रदेशमधील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. एक मोठा रोड शो करत त्यांनी आज (गुरुवार, 11 एप्रिल) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सोनिया गांधी माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. राहुल म्हणाले की, मोदी स्वतःला अजिंक्य समजत आहेत. परंतु त्यांनी एक गोष्ट विसरु नये, की या देशातली जनता त्यांच्यापेक्षा मोठी आहे. नरेंद्र मोदींनी राफेलचे कंत्राट अनिल अंबानीला कसे मिळाले याचे स्पष्टीकरण द्यावे, असे आव्हान राहुल यांनी केले आहे.