अकलूज :  माझ्या परिवाराच्या असण्या-नसण्यावर शरदराव पवारांनी टीका केली. कुठल्याही व्यक्तीला परिवाराची साथ असणे ही मोठी ताकत आहे. परिवाराच्या विषयात शरद पवारांना माझ्याबद्दल वाईट बोलण्याचा अधिकार आहे. ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. ते त्यांची समज आणि संस्काराच्या अनुभवाने हे बोलत आहेत. मात्र त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या परिवाराकडून प्रेरणा घेतली असती तरी पुरेसा होतं, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. मोदींचं कुटुंब नसण्यावरून शरद पवारांनी त्यांच्यावर टीका केली होती. यावर आज मोदींनी प्रत्युत्तर दिले.







अकलूज येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप-शिवसेनेचे इतर नेते उपस्थित होते.


यावेळी मोदी म्हणाले की, इतिहासात मोठा परिवार असणाऱ्या अनेक महापुरुषांनी देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं. परिवार माझी देखील प्रेरणा आहे. महापुरुषांचे परिवार होते, ते परिवार माझी देखील प्रेरणा आहेत. आम्ही या परिवारांकडून प्रेरणा घेतो.  मात्र तुमचं मॉडेल दिल्लीतील एक खास परिवार आहे. तुम्ही त्यांचीच सेवा करा, अशा शब्दात मोदींनी पवारांवर निशाणा साधला.



यावेळी मोदी म्हणाले की, जे दिल्लीत बसले आहेत, त्यांना जमिनीवरील सत्य माहिती नाही. ही गर्दी त्या लोकांनी पाहावी, मग त्यांच्या लक्षात सत्य स्थिती येईल. मला आता लक्षात आलं की शरदराव यांनी मैदान का सोडलं. ते मोठे खेळाडू आहेत. ते वेळेआधी हवेच रूप ओळखतात. दुसरं कुणी बळी गेलं तरी चालेल पण ते आपल्या परिवाराचं आणि आपलं नुकसान कधी होऊन देत नाहीत. त्यामुळेच ते मैदान सोडून पळाले, अशा शब्दात त्यांनी यावेळीही मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

VIDEO | 'तो' ब्लॅक बॉक्स मोदींच्या हेलिकॉप्टरमधून उतरवला? | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा






विजयसिंह मोहिते पाटलांचा सत्कार करणे हे माझं भाग्य : नरेंद्र मोदी

राजकीय जीवनातली 50 वर्ष ही फार मोठी असतात. विजयसिंह मोहिते पाटील यांची 50 वर्षाची कारकीर्द आहे. अशा विजयसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार करण्याचा मान मला मिळाला, हे माझं भाग्य आहे, अशा शब्दात  नरेंद्र मोदी यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांची स्तुती करत सत्कार केला.

विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपप्रवेश केल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील पहिल्यांदाच भाजपच्या मंचावर आले. यामुळे त्यांचा यावेळी मोदींच्या हस्ते सत्कार केला.
विजयसिंह मोहिते पाटलांचा सन्मान करणे हे माझं भाग्य आहे. मी स्वतःला भाग्यशाली मानतो. सार्वजनिक जीवनात त्यांनी कुठल्याही पक्षात काम केलेलं असो, त्यांचं काम मोठे आहे. त्यांना उत्तम स्वास्थ्य आणि दिर्घआयु लाभो आणि त्यांना  देश आणि महाराष्ट्राची सेवा करण्याची आणखी शक्ती लाभो, असे मोदी यावेळी म्हणाले.

राम राम मंडळी, अकलूजकरांनो कसे आहात, पंढरपूरचे दैवत विठ्ठल-रुक्मिणी, अक्कलकोट स्वामी समर्थ, सिद्धेश्वर महाराज, अहिल्यादेवी होळकर यांच्या धरतीला मी वंदन करतो, अशा शब्दात त्यांनी मराठी भाषेत आपल्या भाषणाची सुरुवात केली.

महाराष्ट्र आणि देशातील काही भागात वादळी वाऱ्याने नुकसान झाले. पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना राज्य सरकारची बोलून लागेल ती मदत पोहोचवावी, असे निर्देश दिले आहेत, असे ते म्हणाले.