मुंबई : कुणाला आवडो न आवडो महायुतीच्या विजयी सेलिब्रेशनला नक्की उपस्थित असू, असे खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका तर केलीच त्याशिवाय भाजपच्या सर्वाधिक जागा येतील आणि भाजप बहुमतात येईल असेही म्हटले आहे. महायुतीच्या सेलिब्रेशनच्या वेळी कुणाला आवडो न आवडो वेळी भाजप सोबत आहे तर उपस्थित असणारच, असे राणे म्हणाले.


यावेळी राणे म्हणाले की, आम्ही प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहे याचा विचार करत नाही. आम्ही आमच्या उमेदवाराच्या कामांच्या जोरावर आम्ही निवडणूक लढवली. तिन्ही तालुक्यातील जनता नितेश राणेंवर खुश आहे. समोर कुणी आहे हे महत्वाचं नाही, कुणाला हरवल्याचा आनंद नाही तर आम्ही जिंकल्याचा मला जास्त होईल, असे राणे म्हणाले.

उद्धव ठाकरे आयत्या बिळावर नागोबा, नारायण राणेंची टीका

यावेळी विरोधी पक्षाच्या भूमिकेबद्दल विचारले असता राणे म्हणाले की,  या निवडणुकीत विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाशी लढलाच नाही, अशी स्थिती होती. त्यांच्या प्रचारात काही दम नव्हता. या निवडणुकीत विरोधी पक्षाचे आस्तित्व दिसलं नाही. ही निवडणूक एकतर्फी होणार आहे. भाजप बहुमतात निवडून येईल, असेही राणे म्हणाले.

राणे यावेळी म्हणाले की, कोणताही सत्ताधारी पक्ष ईडीसारखे शस्त्र वापरू शकत नाही. विरोधकांचे हे आरोप म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असे आहे. आक्रमक नेते विरोधी पक्षात दिसले नाहीत. शरद पवार सोडले तर एकही नेता प्रचारात प्रभावीपणे बोलताना दिसला नाही. पाच वर्षात देखील विरोधकांनी काही केलं देखील नाही, असेही राणे म्हणाले.

राज ठाकरेंच्या भूमिकेविषयी राणे म्हणाले की, या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंची जादू वगैरे चालणार नाही. मला विरोधी पक्षाचे स्थान द्या, असं मी पहिल्यांदा ऐकलं. आपण सत्तेत आलो नाही तर विरोधी पक्षातच बसावं लागतं. दोन नंबरचा पक्ष विरोधी पक्ष होतो. मात्र मनसेची तशी स्थिती नाही. राज ठाकरे पहिल्यासारखे प्रभावी देखील दिसले नाहीत, असे ते म्हणाले.