यावेळी राणे म्हणाले की, 370 कलम ज्या दिवशी होतं, त्या दिवशी गडकरी व्यस्त होते. मी जेव्हा सांगितलं की पुस्तक प्रकाशन आहे. त्यांनी तात्काळ वेळ दिली. आपल्या मित्राला आनंद होईल असं वागले. मंत्री विनोद तावडे आणि आशिष शेलार एका फोन वर आले. तटकरे फोन न करता आले. मुख्यमंत्र्यांकडे पुस्तक प्रकाशनासाठी वेळ मागितला पण दिला नाही, असे ते म्हणाले.
राणे म्हणाले की, मी पुस्तक लिहिताना सावधगिरी बाळगली आहे, काही गोष्टी टाळल्या आहेत. शिवसेनेत आता काही नाही आता सगळं संपलं आहे. आम्ही पक्ष वाढवायला, वाचवायला काम केलं. आता शिवसैनिक ते करू शकणार नाहीत. आता शिवसैनिक कमर्शियल झाले आहेत. आम्हाला तर त्यावेळी वडापावही मिळायचा नाही, असेही राणे म्हणाले.
आज नारायण राणेचं जे कौतुक केलं ते माझं नाही तर बाळासाहेबांचं कौतुक आहे. बाळासाहेब माझं भाषण ऐकून सांगायचे तो किती फास्ट बोलतो, हळू बोल. साहेबांनी आम्हाला असं घडवलं. तो काळ पुस्तकात गाळला आहे, असं राणे म्हणाले.
मी साहेबांना 6 पानी पत्र लिहिलं मी शिवसेना सोडतो आहे. दुसऱ्या दिवशी साहेबांनी फोन केला. नारायण रागावला का, एकदा ये. पण तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले राणे परत आले तर मी घर सोडीन. साहेब हे साहेब होते, प्रेम फक्त साहेबांवर केलं, असेही राणे यावेळी म्हणाले.