सिंधुदुर्ग : शिवसेनेने पाच वर्ष फक्त नरेंद्र मोदींवर टीका केली. पाच वर्ष टीका आता पुन्हा सत्तेसाठी युती केली. उद्धव ठाकरेंना लाज कशी वाटत नाही, अशा शब्दात खासदार नारायण राणे यांनी टीका केली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी निलेश राणे यांच्या प्रचारार्थ कुडाळमधील माणगाव खोऱ्यात आयोजित सभेत ते बोलत होते.


VIDEO | खासदार नारायण राणेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा | हॅलो माईक टेस्टिंग | एबीपी माझा



यावेळी राणे म्हणाले की, नाणार मी घालवलं, हे  म्हणतात की नाणार प्रकल्प यांनी घालवला. मच्छीमारांचा प्रश्न मी सोडवला, अरे बाबा तुला मासेमारी कशी करतात हे माहिती आहे का? असा सवाल करत शिवसेना खोटारडा पक्ष आहे. युती केली शरम नाही वाटत का? पाच वर्षे फक्त मोदींवर टीका केली. आता पुन्हा सत्तेसाठी युती करताना उद्धव ठाकरेंना लाज कशी वाटत नाही, असे राणे म्हणाले.

शिवसेना मराठी माणसाच्या हक्कासाठी काम करते असं म्हणतात मग इथे कोण मद्रासी राहतात का? जिल्ह्यात आमदार, खासदार, पालकमंत्र्यांनी कोणती विकासाची कामे केली ती सांगावी, असे राणे यावेळी म्हणाले.

जिल्ह्यात विकासाची कामे करून देखील निवडणुकीत पडलो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पाडलंत. असं कधीही महाराष्ट्रात झालं नाही. माझ्याएवढी विकासाची कामे कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यात केली नाहीत तेवढी कामे मी करूनही निवडणुकीत पडलो, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे स्टार प्रचारक दीपक केसरकर, वैभव नाईक यांना करा, कारण हेच जिल्हाभर आमच्या पक्षाचा प्रचार करत आहेत, अशी खोचक टीका यावेळी नितेश राणे यांनी केली. दीपक केसरकर यांनी अजून सभा घेतल्या तर आमच्या उमेदवाराला फायदा होईल, असेही ते म्हणाले.