मुंबई: राज्यभरातील 216 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 13 जून 2022 रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने 15 ते 21 जून 2022 या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येतील, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज केली.
           
आरक्षणाची सोडत काढण्यात येणाऱ्या 216 पैकी 208 नगरपरिषद आणि 8 नगरपंचायती आहेत. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जामाती माहिला आणि सर्वसाधारण महिलांच्या सदस्यपदांसाठी ही सोडत काढण्यात येईल. आरक्षण सोडतीसाठी संबंधित जिल्हाधिकारी शुक्रवारी (10 जून) नोटीस प्रसिद्ध करतील. 13 जून 2022 रोजी संबंधित ठिकाणी आरक्षण सोडत काढण्यात येईल. 


आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या 15 ते 21 जून 2022 या कालावधीत दाखल करता येतील. संबंधित विभागीय आयुक्त सदस्यपदांच्या आरक्षणास मान्यता देतील. आरक्षणाची अंतिम अधिसूचना 1 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असेही आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.


महापालिकांच्या निवडणुकीच्या तारखा लवकरच
दरम्यान, राज्यातील 14 महापालिकांच्या निवडणुकीसाठीची प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर झालं आहे. मुंबई, ठाणे, नागपूर महानगरपालिकेसह 14 महापालिकांच्या निवडणुका जुलै ते ऑक्टोबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. नऊ महिन्यांपूर्वी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून राज्य निवडणूक आयोगानं पहिल्यांदाच संभाव्य तारखांबाबत संकेत दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगानं या निवडणुकांसाठी 31 मेपर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरणार असल्याचं निश्चित केलं आहे. याचाच अर्थ या तारखेला किंवा त्यापूर्वी नोंदणी केलेल्या मतदारांना या मतदानात मतदान करण्याचा अधिकार असणार आहे. 


कोणत्या महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित?
राज्यातील 14 महापालिकांच्या मुदती संपल्या आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आदी महत्त्वाच्या महापालिकांचा समावेश आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, अकोला, अमरावती या शहरांतील महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.