मुंबई : महाराष्ट्रातील युवकांपर्यंत पोहचण्यासाठी महाराष्ट्र युवक काँग्रेसने नवा उपक्रम हाती घेतला आहे. युवक काँग्रेसच्या 'वेक अप महाराष्ट्र' अभियानाअंतर्गत राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र युवक काँग्रेस युवकांसाठी वेगळा जाहीरनामा तयार करण्यात येणार आहे. या जाहिरनाम्यासाठी राज्यातील 18 ते 30 वयोगटातील मुलांपर्यंत युवक काँग्रेस पोहचणार आहे.


विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांकडून जाहिरनामे तयार करण्यात येतात. मात्र युवक काँग्रेसने राज्यातील तरुणांसाठी वेगळा जाहिरनामा तयार करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी 'वेक अप महाराष्ट्र... उद्यासाठी आता' कॅम्पेनची सुरुवात करण्यात येणार आहे.  येत्या काळात युवक काँग्रेसतर्फे राज्यात विविध ठिकाणी चर्चासत्र, वेगवेगळ्या स्पर्धा यांचं आयोजन केलं जाणार आहे. या माध्यमातून युवकांची मतं, भूमिका जाणून घेऊन युवकांसाठीचा जाहीरनामा तयार करणार येणार आहे. पुढचे 45 दिवस महाराष्ट्रात विविध तालुक्यात हे कार्यक्रम होणार आहेत.


या अभियानात देशातील काँग्रेस वरिष्ठ नेते तसेच युवा नेते सहभागी होणार आहेत. या अभियानासाठी राज्यभर फिरणार असल्याची माहिती महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली आहे. "तरुण मतदारांचा भ्रमनिरास होत चालला आहे, अर्थव्यवस्थेचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे येत्या 45 दिवसात राज्यात फिरणार असून ठिकठिकाणी कार्यक्रम करणार आहे", अशी माहिती सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.

महाविद्यालयीन निवडणुकांचं स्वागत
'राज्यात पुन्हा सुरु झालेल्या महाविद्यालयीन निवडणुकांचं आपण स्वागत करतो, या निवडणूका लढण्यासाठी तयार आहोत. विद्यार्थी काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना, समविचारी विद्यार्थी संघटना यांच्या संपर्कात आहोत', अशी माहिती सत्यजीत तांबे यांनी दिली. सर्वांनी एका व्यापीठावर येऊन भाजप-सेनेच्या विद्यार्थी संघटनांविरोधात कसं लढत येईल याची तयारी करू, असंही ते म्हणाले