धुळे : वन शेती, वन औषधी, जंगल संवर्धन, सेंद्रिय शेती अशी ओळख असलेला बारीपाड्याने साक्री तालुक्याचे नाव जगाच्या नकाशावर आणलं. बारीपाडा हे साक्री तालुक्यात आहे. मात्र असं असताना दुसरीकडे साक्री तालुका अजूनही विकासापासून दूर आहे. सूरत-नागपूर महामागार्वर असलेला हा तालुका उपेक्षितच राहिला आहे. विधानसभा निवडणुकीचे वेध राजकीय मंडळींसोबत सर्वसामान्य जनतेला देखील लागले आहेत. धुळे जिल्ह्यातील साक्री हा आदिवासी बहुल राखीव मतदार संघ आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून हा मतदार संघ ओळखला जातो.


काँगेसचे डी. एस. अहिरे ऊर्फ धनाजी सीताराम अहिरे हे या मतदार संघाचे विद्यमान आहेत. अहिरे यांनी भाजपच्या मंजुळा गावित यांचा 3 हजार 323 मतांच्या फरकाने पराभव केला होता. मात्र मतांचा हा फरक पाहता काँग्रेससाठी चिंता करणारा ठरला. मंजुळा गावित यांनी 1 जुलै 2011 ते 31 डिसेंबर 2013 अडीच वर्ष धुळ्याच्या प्रथम महिला महापौर म्हणून कारभार पाहिला आहे.


विशेष म्हणजे त्यावेळी धुळे महानगरपालिकेत राष्ट्रवादीचे संख्याबळ अधिक होतं. तर भाजपचे केवळ तीन सदस्य असताना मंजुळा गावित यांनी राष्ट्रवादीच्या महापौर पदाच्या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला होता. मंजुळा गावित या मूळच्या साक्री तालुक्यातील असल्याने त्यांनी महापौर पदाचा कालावधी संपल्यानंतर आपल्या तालुक्याकडे लक्ष केंद्रित केलं.


साक्री विधानसभा 2014 च्या निवडणुकीत मतदानाची आकडेवारी


डी एस अहिरे (काँग्रेस ) - 74 हजार 660
मंजुळा गावित (भाजप ) - 74 हजार 437
चुडामण पवार (शिवसेना ) - 12 हजार 832
दिलीप नाईक (राष्ट्रवादी ) - 12 हजार 398
इतर उमेदवारांनी मिळालेली मते - 17 हजार 364


2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका या स्वबळावर झाल्याने भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी स्वतंत्र आपले उमेदवार उभे केले आहेत. याचा फायदा कोणाला किती झाला हे वर असलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होतं.


पवन वीज निर्मिती, सौर ऊर्जा वीज निर्मित असे मोठे वीज निर्मिती प्रकल्प या भागात असून देखील रोजगाराचा प्रश्न सुटलेला नाही. रोजगार, दळणवळण, औद्योगिक विकास यांचा अभाव असलेला हा मतदार संघ आहे. या मतदार संघात एकमेव असलेला साखर कारखाना गेली अनेक वर्ष बंद आहे. त्याचबरोबर सूतगिरणी, सहकारी दूधसंघ हे बंदच असल्यानं बेरोजगारीच्या समस्येत यात भरच पडली आहे. आदिवासी बांधवांचा वन जमिनीचा प्रश्न सोडवण्यासाठी आज देखील संघर्ष सुरुच आहे.


1984 ते 1999 या कालावधीत साक्री विधानसभा मतदारसंघात भाजपला मतदारांनी संधी दिली. भाजपचे गोविंद शिवराम चौधरी यांच्या रुपाने प्रथमच तालुक्याला मंत्रिपद मिळालं होतं. मात्र साक्री तालुक्याचा विकास होईल ही मतदारांची अपेक्षा फोल ठरली.


साक्री तालुक्यातील काटवान, माळमाथा परिसरात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे. या भागासह संपूर्ण तालुक्यात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. विशेष म्हणजे अक्कलपाडा धरण, पांझरा, मालनगाव ही तीन धरणे याच साक्री तालुक्यात असताना सिंचन क्षेत्र उपाययोजनांचा अभाव यामुळे आजही साक्रीचा विकास झालेला नाही.


साक्री विधानसभा मतदार संघ हा आदिवासी बहुल असल्यानं हा विधानसभा मतदार संघ नंदुरबार लोकसभा मतदार संघात येतो. विद्यमान आमदार धनाजी सीताराम अहिरे हे भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या चर्चा सध्या साक्री तालुक्यात सुरु आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करुन यंदा पुन्हा आपलं राजकीय भवितव्य आजमावू पाहणार असल्याची चर्चा आहे. मात्र या वृताला आमदार डी एस अहिरे यांच्याकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही.


तर दुसरीकडे धुळ्याच्या प्रथम महिला महापौर म्हणून मान असलेल्या मंजुळा गावित या देखील भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढण्यास तयार आहेत. तर साक्री तालुक्यातील काही डॉक्टर्स, इंजिनीअर्स तसेच माजी खासदारांचे नातेवाईक यंदा आपलं राजकीय भवितव्य आजमावण्यासाठी इच्छुक आहेत. यंदाची विधानसभा देखील ही स्वबळावरच लढवावी असा शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा सूर आहे, मात्र पक्षश्रेष्ठींचा आदेश अंतिम असल्याने कार्यकर्ते मौन बाळगून आहेत.


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत साक्री विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या हिना गावित यांना 6 लाख 39 हजार 136 मते मिळाली होती. तर काँग्रेसचे के सी पाडवी यांना 5 लाख 43 हजार 507 मते मिळाली. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या साक्री विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला 95 हजार 629 मतांचं मताधिक्य मिळालं. यावरुन काँग्रेससाठी ही बाब विधानसभेत आत्मचिंतन करायला लावणारी आहे. सध्या साक्री तालुक्यात पक्षांतराचे वारे वाहत असल्याने या वाऱ्यात हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात राहणार की भाजपच्या ताब्यात जाणार? हे विधानसभा निवडणुकीच्या निकालनंतर स्पष्ट होईल.