Sanjay Raut on BJP : भाजपच्या टार्गेटवर कोण आहे हे आम्हाला माहिती आहे. आम्ही तुरुंगातून जाऊन आलो आहोत. भाजप बिश्नोई गॅंग असून त्यांच्याकडे हत्यार म्हणून ईडी, सीबीआय असल्याचा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी आज जागावाटपावरून सुद्धा माहिती दिली. संजय राऊत यांनी यावेळी बोलताना विदर्भ हा महाराष्ट्राचा भाग आहे कोणाचे स्वतंत्र संस्थान नसल्याचा खोचक टोला सुद्धा काँग्रेसला लगावला. बऱ्याच जागांवर चर्चा पूर्ण झाली असून काही जागांची चर्चा बाकी आहे आणि त्या संदर्भाने मी उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो आहे. त्यांनीही काही सूचना दिल्या असून त्याचं मी पालन करणार असल्याचे ते म्हणाले. 


विदर्भातील जागांवरून संजय राऊत काय म्हणाले? 


जागा वाटपा संदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की बऱ्याच जागा संदर्भातील चर्चा पूर्ण झाली आहे. मात्र काही जागांबाबत चर्चा अजूनही सुरू आहे. लवकरात लवकर जागा वाटपाचा तिढा सुटण्यासाठी मी आज राहुल गांधी यांच्याशी बोलणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की मी काँग्रेस सरचिटणीस वेणुगोपाल यांच्याशी माझं बोलणं झालं असून महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासोबतही सुद्धा माझं बोलणं झालं आहे. त्यामुळे लवकरात लवकर जागावाटपाचा चर्चा पुढे सरकण्यासाठी बोलणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान विदर्भातील काही जागांवर वाद असल्याचा संजय राऊत यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालं आहे. ते म्हणाले की, आम्ही रामटेकसारखी सहा वेळा निवडून आलेली जागा काँग्रेसला दिली. अमरावतीची सुद्धा जागा आम्ही दिली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या जागा आम्ही दिल्या त्या जागांवर जिंकल्या सुद्धा आहेत. त्यामुळे तेथील कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्यायला हव्यात. त्यामुळे विधानसभेला आम्हाला अधिक जागा मिळायला हव्यात हे समजून घ्यायला हवं, असं त्यांनी सांगितलं.


दरम्यान निवडणूक आयोगाच्या काही जाचक अटींविरोधात आम्ही त्यांना भेटणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट यांनी केले. आज शिवसेना ठाकरे गटामध्ये कोकणातून दीपक साळुंखे आणि राजन तेली यांचा पक्षप्रवेश होत असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आणखी काही महत्त्वाचे पक्षप्रवेश होणार असल्याचेही ते म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या