Jagdish Mulik: पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघाचा काल (शुक्रवारी) उमेदवार जाहीर झाला. आज सकाळी(शुक्रवारी) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली. वडगाव शेरी मतदारसंघातून भाजपचे नेते आणि माजी आमदार जगदीश मुळीक देखील आग्रही होते, जगदीश मुळीक यांना भाजप श्रेष्ठींनी शब्द दिल्याचं देखील त्यांनी याआधी सांगितलं होतं, त्यानंतर काल सकाळी सुनील टिंगरे यांच्या नावाची घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. त्यानंतर आता जगदीश मुळीक नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. जगदीश मुळीक भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. 


जगदीश मुळीक देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला 


राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या नेत्याला म्हणजेच विद्यमान आमदार सुनिल टिंगरेंना वडगाव शेरी मतदारसंघाची जागा सुटल्याने मुळीक नाराज असल्याच्या चर्चा आहेत. काल उमेदवारी जाहीर झाल्याने जगदीश मुळीक देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. मुळीक यांची नाराजी देवेंद्र फडणवीस दूर करणार का? याकडे आता लक्ष लागलं आहे. याआधी जगदीश मुळीक यांच्याकडून दोन-तीन वेळा सागरवर येत देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्या होत्या. मात्र, तरीही ती जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला गेल्याने मुळीक नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. 


पुण्याच्या लोकसभा निवडणुकीवेळी देखील भाजपने उमेदवारी नाकारल्याने नाराज झाले होते, त्यानंतर त्यांना विधानसभेत संधी दिली जाईल अशा चर्चा होत्या, त्या अनुषंगाने त्यांनी अनेकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मात्र, काल वडगाव शेरी मतदारसंघातून सुनील टिंगरेंना उमेदवारी मिळाली, त्यामुळे आता जगदीश मुळीक यांची नाराजी दूर होऊन ते आता प्रचारात सक्रिय होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंं आहे.


वडगाव शेरीमध्ये उमेदवारी मिळण्याबाबत काय म्हणाले जगदीश मुळीक?


एबीपी माझाशी बोलताना वडगाव शेरीचे भाजपचे इच्छुक उमेदवारी जगदीश मुळीक म्हणाले होते, वडगाव शेरीमध्ये भाजपचे संघटन चांगले आहे, वडगाव शेरीच्या नागरिकांना आणि कार्यकर्त्यांची ही जागा भाजपला मिळावी अशी भावना आहे, तर मतदारसंघातील नागरिकांना स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार हवा आहे. त्याचबरोबर परिसरातील सर्व समस्या, भ्रष्टाचार कमी करणारा उमेदवार हवा आहे, मतदारसंघातील उमेदवारीबाबत वरिष्ठांशी चर्चा झालेली आहे. हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आल्यास आम्ही १०० टक्के जिंकू असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला होता., मात्र, उमेदवारी जाहीर झाली नसल्याने मुळीक नाराज आहेत, आज भेटीत फडणवीस नाराजी दुर करण्यासाठी कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.