जळगावमधील अमळनेरमध्ये भाजपच्या मेळाव्यात जोरदार राडा झाला होता. भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि समर्थकांनी पक्षाचे माजी आमदार बी एस पाटील यांना मारहाण केली होती. यावेळी मंचावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील इत्यादी नेते उपस्थित होते. महाजनांनी मध्यस्थी करत राडा सोडवला होता.
उदय वाघ आणि बी एस पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली. मग या वादाचं पर्यवसन हाणामारीत झालं. मंचावरच दोन्ही नेते भिडले. यावेळी चपला बुटांनी एकमेकांना मारलं होतं.
उदय वाघ हे आमदार स्मिता वाघ यांचे पती आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव मतदारसंघात स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करुन उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द होण्यामागे बी एस पाटील यांचा हात असल्याचा संशय उदय वाघ यांच्या मनात होता. त्याच रागातून ही हाणामारी झाल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे, रावेरमध्ये विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्यासमोर काँग्रेस उमेदवार उल्हास पाटील यांचं आव्हान होतं. मात्र रक्षा खडसेंना आपली जागा टिकवण्यात यश आलं आहे.