मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून त्याची जोरदार तयारी सुरू केल्याचं चित्र आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांची बुधवारी मुंबईत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मार्गदर्शन करणार आहेत. 


लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जिल्हानिहाय बांधणी सुरु केली आहे. मिशन 45 साठी भाजपची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत ज्येष्ठ नेते पक्ष विस्तारासह महायुतीचे सूत्र समजून सांगणार आहेत. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.


आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांना समोर ठेवत भाजपचं मिशन 45 सुरू केले आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या  48 पैकी 45 जागा जिंकण्याचं टार्गेट भाजपने ठेवलं आहे. याच मिशनसाठी काही केंद्रीय मंत्र्यांचे दौरे राज्यातील लोकसभा मतदारसंघात पार पडले आहेत. आता भाजपचे प्रमुख नेते विधानसभेच्याही 144 मतदारसंघात दौरे करणार असून निवडणुकीची रणनीती आखणार आहेत.  भाजपाच्या मिशन 45 साठी चंद्रशेखर बावनकुळे संयोजक आहेत.


महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघांत केंद्रीय मंत्री भेटी देत असून त्यामाध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद सुरू आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने 16 मतदारसंघ निवडले आहेत. त्यापैकी दहा मतदारसंघात शिवसेनेचं प्राबल्य असलेले आहेत. 


कोणकोणत्या जागांवर भाजप लक्ष देणार?


बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रित केलं आहे. बारामती, मावळ, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या मतदारसंघात  भाजप आपली ताकद लावणार आहे.  यामध्ये 18 मतदारसंघात भाजप विशेष लक्ष देणार आहे.


लोकसभा मिशन 45 साठीचे भाजपचे शिलेदार कोण?  
 
भाजपने 12 प्रमुख नेत्यांची या मिशनसाठी निवड केली आहे.  प्रत्येक नेत्याकडे दोन लोकसभा मतदारसंघ असं हे गणित आहे. आशिष शेलार, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे हे प्रमुख नेते आहेत. 


2019 च्या लोकसभेचं गणित काय होतं? 


महाराष्ट्रात लोकसभेचे 48 मतदारसंघ आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. 2019 ला 48 पैकी 23 जागा भाजपनं जिंकल्या तर 18 जागांवर शिवसेनेनं विजय मिळवला. चार जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजय मिळवला असून काँग्रेस आणि एमआयएमचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे. मात्र आगामी निवडणुकीत भाजपनं 45 जागांवर जिंकण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आहे.


ही बातमी वाचा: